Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..
Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील 24 तास अत्यंत धोक्याची असून रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट विविध भागांमध्ये देण्यात आला.

मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगर, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि विदर्भातील काही शहरांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये आज 22 जुलै 2026 रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी केला. पुढील 24 तासात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रोहतक सिधी रांची ते दिघा वायव्य उपसागरापर्यंत 1.5 किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.
अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, राजस्थान, ओडिसा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश ते बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. आज भारतीय हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि सातारा घाटमाथा, कोल्हापूर येथे अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला.
या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. वादळी वाऱ्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. कडवा, भावली आणि पालखेड धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात.
कडवा धरणातून 374 क्युसेक, भावली धरणातून 1,218 क्युसेक, तर पालखेड धरणातून 1,392 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन. कालपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत संततधार पाऊस कायम. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस; धरणांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ. पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
जालना जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत रिमझिम पावसाची संततधार सुरू असून पहाटेपर्यंतही पावसाची रिपरिप कायम असल्याच पाहायला मिळत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन,कापूस, तूर, मका यासारख्या पिकांबाबत शेतकरी चिंतेत होते.
