उद्धव ठाकरे यांनी कुराणाचं पठण करावं; रामरक्षा आंदोलनावरून जैन मुनी निलेशचंद्रांचं टीकास्त्र
jain muni nileshchandra : जैन मुनी निलेशंचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंनी कुराण वाचलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी निशाणा आहे.

अयोध्येतील राम मंदिरातील देणगीतील गैरव्यवहार प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गट या गैरव्यवहार प्रकरणावरून मुंबईनंतर आता नागपुरात आंदोलन करणार आहे. नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी ठाकरे गटाने अनेक हिंदुत्ववादी संघटनांना आमंत्रण दिलं आहे. परंतु रामरक्षा आंदोलनावरून ठाकरेंना सत्ताधाऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. भाजपच्या नेत्यांच्या टीकेनंतर आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.
जैन मुनी निलेशचंद्र यांनी माध्यमाशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ‘रामरक्षा वाचण्यापेक्षा त्यांनी कुराण वाचावं. औरंगजेब हा भाऊ असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांना रामरक्षा हनुमान चालीसा पठण करण्याची गरज नाही, अशा शब्दात निलेशचंद्र यांनी घणाघात केल आहे.
अमरावतीत बोलताना निलेशचंद्र यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. ‘उद्धव ठाकरे यांना ज्यावेळी हनुमान चालीसा वाचण्याची आवश्यता होती, त्यावेळी त्यांनी नवनीत राणा यांना 14 दिवस तुरुंगात धाडलं. त्यांना आंदोलनात धड वाचता देखील येत नाही. खरंतर त्यांनी कुराण पठण केलं पाहिजे. राम रक्षा त्यांच्या गरजेची नसून त्यांना श्राप लागलाय. आता त्यांना शुद्धीकरणाची गरज आहे’, अशी टीका त्यांनी केली.
‘आम्ही राम मंदिरातील चोरी पाहून घेऊ. आमच्या बाबी आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचं पाहा. खरंतर श्रीरामाला धन आणि वैभवाची आवश्यकता लागत नाही. राम मंदिरासाठी आंदोलन का केलं नाही? राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. देवाभाऊ हे राम आहेत. ठाकरेंनी कुराण वाचावं. त्यांना कुराणाची गरज आहेत. त्यांच्यासाठी रामरक्षा कवच नाही, असे निलेशचंद्र यांनी पुढे म्हटलं.
तत्पूर्वी, ठाकरे गटाने नागपूरच्या रामनगरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन आयोजित केलंय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विविध ठिकाणी आंदोलनाचे बॅनर लागले आहेत. रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणाजे देशद्रोह या आशयाचे बॅनर ठाकरे गटाने सर्वत्र लावले आहेत. रामनगरमधील मंदिर परिसरात भगव्या पताका लावल्यात. त्याचबरोबर मंदिर देखील फुलांनी सजवलं आहे. रामरक्षा आंदोलन 4 वाजता होणार आहे. या आंदोलनात ठाकरे काय बोलणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.