
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून तरुणांकडून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलले. तिने पतीसह मिळून प्रियकराची हत्या केली आहे. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा 3 या गावात ही घटना घडली आहे. संजय जाधव आणि सोनाली जाधव असे संशयित आरोपी पती-पत्नीचे नाव आहे. तर विजय राठोड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पती-पत्नीने खून केल्याचे कबूल केले असले तरी मृतदेहाची विल्हेवाट आणि खून नेमका कसा केला याबाबत वेगवेगळ्या कहाण्या सांगत असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा गुंता दृश्यम सिनेमाप्रमाणे वाढल्यामुळे पोलिसांचे डोके देखील चक्रावले आहे.
नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीत वरसाडे तांडा येथील विजय भिमा राठोड (वय २५) हा २४ फेब्रुवारीच्या रात्री घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाला होता. याबाबत त्याचा भाऊ संजय राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून २६ फेब्रुवारी रोजी मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संजय परशुराम जाधव याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी चौकशीत त्याने पत्नी सोनाली जाधव हिचे विजय राठोड याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत दोघांनी मिळून त्याचा खून केल्याची कबुली दिली.
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ काढून धमकावत असल्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान, खून कसा केला आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत आरोपी पती-पत्नी पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या सांगत आहेत. कधी गळा आवळून खून केल्याचे, कधी हात-पाय बांधून गळा आवळल्याचे तर कधी लोखंडी हत्याराने वार केल्याचे ते सांगत आहेत. मृतदेह जाळला, जंगलात फेकला किंवा जाळल्यानंतर राख टाकली अशा तीन वेगवेगळ्या माहितीही त्यांनी दिल्या आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी संजय जाधव आणि सोनाली जाधव या दोघांना अटक केली असून पाचोरा न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.