महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, 5 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी कोसळधारा सुरूच!

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेरच्या खदाणीत फिरायला गेल्यानंतर ही तिन्ही मुलं सेल्फी काढत होते. सेल्फी काढत असताना एका बालकाचा पाय घसरला. त्या मुलाला वाचवण्याचा दोघांनी प्रयत्न केला.

महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, 5 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी कोसळधारा सुरूच!
jalgaon rain update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2026 | 10:42 PM

 Jalgaon Rain Update : सध्या राज्यात पावसाने थैमान घातले आहे. कोकण किनारपट्टी, नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांत सगळीकडे पाऊसच पाऊस आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. उपनगरातील काही भागात तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लोकलची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही नद्यांना पूर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे कुठे दरड कोसळून तर कुठे इमारत कोसळून निष्पाप लोकांचा मृत्यू होत आहे. जळगावातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका खदाणीत तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एका खदाणीत बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे सध्या खदाणी, नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अशा स्थितीत नागरिक उत्साहाने फिरायला घराबाहेर पडत आहेत. परंतु उत्साहाच्या भरात अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. या तीन बालकांसोबतही असेच काहीसे घडले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात या तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

तीन मुलं नेमकं काय करत होते?

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेरच्या खदाणीत फिरायला गेल्यानंतर ही तिन्ही मुलं सेल्फी काढत होते. सेल्फी काढत असताना एका बालकाचा पाय घसरला. त्या मुलाला वाचवण्याचा दोघांनी प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

पावसामुळे खदानीत मोठ्या प्रमाणावर पाणी

समोर आलेल्या माहितीनुसार मानव बंटी रतनानी वय १४, कार्तिक विकी उधवानी वय १४ व दिनेश विजय पंजवानी वय १७ अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. पावसामुळे खदानीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याची माहिती समोर आली आहे. एका वेळी 3 निरागस मुलांचा मृत्यू झाल्याने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त केला जात आहे.

विरारमध्ये तिसरा बळी

दुसरीकडे सलग चार दिवसापासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे नालासोपाऱ्यात तिसरा बळी गेला आहे. अतिवृष्टीत मित्र सोबत मैदानात साचलेल्या पाण्यात पोहत असताना, त्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने १३ वर्षाच्या मुलाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

मुंब्रा कौसा भागात इमारतीची गॅलरी कोसळली…

ठाण्यातील मुंब्रा कौसा भागात ३० ते ३४ वर्षे जुन्या चांदणी इमारतीची गॅलरी कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीखाली चहाची टपरी चालवणारा २४ वर्षीय तरुण अब्दुल रहमान शेख गंभीर जखमी असून डोक्याला दुखापत झाल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणावळ्यात भीषण भूस्खलन, एकाचा मृत्यू

लोणावळ्यातील जुना खंडाळा येथील नॉर्थ पॉइंट आणि थ्री सिक्सटी रिसॉर्ट परिसरात मध्यरात्री अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत रिसॉर्टवरील एक माळी आणि एक सुरक्षा रक्षक असे दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत थेट युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू केले .शर्थीच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर अद्याप एक जण अडकून पडला आहे. दरम्यान, परिसरातील मलबा बाजूला केल्यानंतरही वरून पुन्हा ढिगारा खाली येत असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

Follow Us