ठाकरेंचे फायरब्रँड नेते जेलमधून बाहेर, शिंदेंचे मुलुखमैदान तोफ गुलाबराव पाटील म्हणतात….

संजय राऊत यांच्या जेलमधून सुटकेनंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

ठाकरेंचे फायरब्रँड नेते जेलमधून बाहेर, शिंदेंचे मुलुखमैदान तोफ गुलाबराव पाटील म्हणतात....
Chetan Patil | Updated on: Nov 09, 2022 | 9:47 PM

जळगाव : शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा मिळालाय. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा आज जामीन मंजूर केलाय. त्यामुळे संजय राऊत यांची आज जामिनावर जेलमधून सुटका झाली. त्यांच्या सुटकेनंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राऊतांना का अटक झाली होती? ते साऱ्या जगाला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

“ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या आरोपीला अटक होणे आणि जामिनावर सुटणे हा न्यायालयाचा भाग असतो”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“संजय राऊतांना अटक का झाली होती? ती कोणत्या कारणास्तव झाली हे आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे. त्यांची सुटका झाली म्हणून त्यांच्या पक्षाच्या लोकांना आनंद होणे, त्यातून जल्लोष होणं हे स्वाभाविक आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“कोणत्याही पक्षातला माणूस एखाद्या वेळेस कारागृहामध्ये गेला आणि जर त्याची जामिनावर सुटका झाली तर पक्षातील सर्वांना आनंद होत असतो”, असं गुलाबराव म्हणाले.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचादुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होईल याबाबतही माहिती दिली. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल. हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अधिकार आहे, असं मत त्यांनी मांडलं.

‘आमची महिला आघाडी बघणार’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केलेल्या टीकेवर गुलाबरावांनी प्रतिक्रिया दिली. “आमची महिला आघाडी त्यांच्या टीकेला उत्तर देत आहेत. मला असं वाटतं की, ध चा म करून बोलणे हा एक प्रकारचा पायंडा त्यांनी पाडला आहे. आता आमची महिला आघाडी बघणार आहे”, असं गुलाबरावांनी सांगितलं.

“आमची आई काढली गेली, आमचा बाप काढला गेला. आमची जात काढली गेली. हे कोणत्याही चॅनेलने दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट आम्ही काही दोन अर्थाने बोललो तर दाखविलं जातं. आज जर दादा कोंडके असते तर समजलं असतं. मात्र दोन अर्थाने बोललो तर कोणताही नेता अडचणीत येईल”, असं गुलाबराव म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us