
Auto Rickshaw Fair Hike: सध्या राज्यात अभूतपूर्व अशी एलपीजी सिलेंडर कोंडी झाली आहे. सरकार सिलेंडर असल्याचा दावा करत आहे. तर गॅस एजन्सीसमोरील गर्दी हटायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. भल्या पहाटे पाच वाजेपासून लोक सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. ऑनलाईन गॅस बुकिंग होत नसल्याने चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे रिक्षा चालकांनाही गॅस दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. दरवाढीने भाडेवाढ झाल्याने सर्वसामान्यांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे. महागाईचे चटके सर्वसामान्य नागरिकांना सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे.
55 रुपये गॅस भाव आता 90 रुपये किलोवर
जळगावातील इच्छा देवी चौक परिसरातील एलपीजी गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.जळगाव शहरात एलपीजी गॅसचे एकूण तीन पंप असून दोघांवरील गॅस संपल्याने एकच गॅस पंप सध्या स्थितीत सुरू आहे. एकाच पंपावर गॅस शिल्लक असल्याने रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. तब्बल दोन ते तीन तास रांगेत थांबून गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांचा नंबर लागत असल्याचा पाहायला मिळत आहे.
एकीकडे गॅसचा तुटवडा तर दुसरीकडे एलपीजी गॅस मध्ये अचानक झालेली वाढ यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सुरुवातीला 55 रुपये गॅसचा किलोमागे भाव होता मात्र आता अचानक 90 रुपये किलो एवढा भाव झाल्याने रिक्षा चालक आर्थिक संकटात सापडला आहे. रिक्षात भरण्याच्या एलपीजी गॅस मध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली असून रिक्षा चालवणे परवडत नसल्याचे म्हटले आहे.
व्यावसायिक सिलेंडरची मागणी
इगतपुरी शहरात व्यासायिक सिलेंडरचा तुटवडा कायम आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या हॉटेलव्यवसायिकांनी चुलीवर जेवण तयार करायला सुरुवात केली आहे. तर इतर हॉटेल व्यवसायिक चुली तयार करत आहेत. अनेक हॉटेल व्यवसायिकांनी मेनू मध्ये कपात केली आहे. मात्र चुलीवरचे जेवण परवडत नसल्याने काही दिवस हॉटेल बंद करण्याचा निर्णय काही जणांनी घेतला आहे. अगोदरच इगतपुरीतील काही हॉटेल बंद झाली आहेत.
ई-रिक्षा, बाईकसाठी परवाना बंधनकारक
राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परवाना देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित केली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई – बाईकना यापुढे मोटार वाहन विभागाकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.