‘काळा पैसा ठेवायचा कुठे? ही भीती असेल’, उल्हास पाटील यांच्या प्रश्नावर खडसेंचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 25, 2024 | 11:04 PM

काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांच्यावर सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या केतकी पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘काळा पैसा ठेवायचा कुठे? ही भीती असेल’, उल्हास पाटील यांच्या प्रश्नावर खडसेंचं मोठं वक्तव्य
eknath khadse
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

जळगाव | 25 जानेवारी 2024 : काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांच्यावर सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या केतकी पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबतच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “डॉ. उल्हास पाटील यांच्या मेडिकल कॉलेज यासह वेगवेगळ्या आस्थापना आहेत. त्यात अनियमित असू शकते, मोठमोठे पैशांचे व्यवहार होतात. त्यामुळे हा काळा पैसा ठेवायचा कुठे? ही भीती असते. या भीतीपोटी डॉक्टर उल्हास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

यावेळी एकनाथ खडसे यांनी आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली. “ज्या-ज्यावेळी शरद पवारांना ईडीची नोटीस झाली त्या त्यावेळी सहानुभूतीचे मोठी लाट आली. विरोधी पक्षाचे असल्यामुळे सरकारकडून छळण्याचा प्रकार सुरू आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या यंत्रणांच्या या माध्यमातून विरोधी पक्षांना जाणीवपूर्ण टार्गेट केलं जात आहे. सत्ताधारी पक्षाचे सर्वच स्वच्छ कसे? विरोधकांना नामोहरण करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

‘केंद्र सरकारच्या विरोधात आज देशामध्ये जनमत’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. याबाबतच्या प्रश्नावर खडसेंनी उत्तर दिलं. “इंडिया आघाडीतून अनेक जण बाहेर पडतात, अनेक जण आतमध्ये येतात. यालाच आघाडी म्हणतात. एखादा व्यक्ती गेली, एखादा पक्ष गेला त्यापेक्षा जनतेचे काय मत आहे हे महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आज देशामध्ये जनमत हे तयार झालेलं आहे”, असं खडसे म्हणाले.

यावेळी एकनाथ खडसे यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली. “निवडणुका जवळ आल्या की भाजपकडून गंगा पूजन यासह असे वेगवेगळे कार्यक्रम हे घेतले जात असतात आणि आता हे जनतेला सुद्धा माहीत झालं आहे. रामलल्ला हे एकटे बीजेपीचे नाहीत, ते तुमच्या आमच्यासारख्या सर्वांचेच आहेत. त्यामुळे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा भाजपला फायदा होईल असं चित्र नाही. लोक आता भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत”, असं खडसे म्हणाले.

भजप-शिवसेनेच्या युतीवर खडसेंचं मोठं वक्तव्य

“शिवसेनेकडूनच भाजपला युतीचा प्रस्ताव आला होता याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि त्या प्रक्रियेत मी होतो. त्यानंतरही भाजपने सर्व जागांवर आपले उमेदवार लढविण्यासाठी अनेक मान्यवरांचा पक्षात प्रवेश करून घेतला होता. यात काही जागा या शिवसेनेच्या असताना सुद्धा त्या ठिकाणी भाजपने मान्यवरांचा प्रवेश केला, म्हणजेच या जागा सुद्धा भाजपला लढायच्या होत्या. ज्यावेळी भाजपला आता सर्व जागा या स्वबळावर लढू शकतो, असा विश्वास आला त्यावेळी युती तोडण्याचा निर्णय हा झाला. त्यानंतर मग जागा वाटपाचं कारण समोर करून शिवसेनेसोबत युती तोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पक्षाच्या आदेशाप्रमाणे युती तुटली असे मी जाहीर केलं”, असं एकनाथ खडसे म्हणाले.