जरांगेंचं उपोषण कधी सुटणार? गिरीश महाजन यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले, उद्या किंवा…
Girish Mahajan and Manoj Jarange Patil : कडाक्याच्या उन्हात बाज टाकत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे. आता मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणावर मोठे विधान केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. कडाक्याच्या उन्हात बाज टाकत जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला सुरुवात होताच सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला आहे. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांच्या उपोषणावर मोठे विधान केले आहे. महाजन यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले महाजन?
मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर भाष्य केले आहे. महाजन यांनी म्हटले की, ‘विखे पाटील आणि प्रसाद लाड त्यांच्याशी बोलत आहेत, लवकरच हा प्रश्न सुटला पाहिजे. मी सकाळी पाहिलं, ते उन्हात खाट टाकून बसले आहेत. विखे पाटील सरकारच्या वतीने त्यांच्याशी बोलत आहेत. उद्या किंवा परवा लवकरच प्रश्न सुटतील. जरांगे पाटलांना जास्त वेळ उन्हात बसावं लागणार नाही.’
पंकजा मुंडेंच्या प्रशासनाला सूचना
मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधील शेतात जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचे आणि जरांगे पाटलांची तब्येत बिघडू नये याची प्रशासनाने दक्षता घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची आणि भेटण्याची तयारी दर्शवली आहे.
जरांगे पाटलांच्या मागण्या काय आहेत?
- मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
- सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.
- मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या.
- आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.
- सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
- महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप करा.
- कुणबी प्रमाणपत्र दिले आहे, त्याची व्हॉलिडिटी द्या.
- मराठा उपसमिती बरखास्त करा.
- स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
- शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला सांगा.