IMD Weather Update : हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्राला मोठा इशारा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली होती, परंतु दिलासादायक बातमी म्हणजे मागच्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे, परंतु आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालं असून, गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर येत्या 20 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. 17 जुलै रोजी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांसह 12 राज्यांना आयएमडीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात प्रति तास 60 किमी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. वादळी वाऱ्यांमुळे काही भागांमध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटना देखील घडू शकतात, तसेच पर्वती प्रदेशात भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व भारतातील राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा?
भारतीय हवामान विभागाकडून उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तसगढ या राज्यांना हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असून, या काळात प्रति तास 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं हवामान विभाने म्हटलं आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे, परंतु मागील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या 20 तारखेपासून मराठवाडा, कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 20 तारखेपासून 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, ज्यामध्ये नांदेड, बीड, नाशिक, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांसह इतर काही जिल्ह्यांचा समावेश आहे.
