
Jitendra Awhad : राज्य सरकारने आणलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026’ वर आज विधानसभेत सखोल चर्चा झाली. या विधेयकात नेमक्या काय-काय तरतुदी आहेत, याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. विधेयकात सक्तीच्या धर्मांतराविरोधात काय शिक्षा असेल, याबाबतही त्यांनी सभागृहाला सांगितले. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या विधेयकावर काही आक्षेप घेतले. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य नव्हे तर धर्माला नियंत्रित केले जात आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. याच वेळी भाषण करत असताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या उल्लेखावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. परिणामी सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आव्हाड यांनी सभागृहाची माफीदेखील मागितली.
जितेंद्र आव्हाड हे धर्मस्वातंत्र्य विधेयकावर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. या विधेयकाच्या माध्यमातून धर्मावर पाळत ठेवण्यात येत आहे. एखाद्याने धर्म बदलला तर त्याला थेट गुन्हेगार ठरवले जात आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.
जेव्हा-जेव्हा धर्माविरोधात बोलण्याची वेळ आली, तेव्हा-तेव्हा लोक धर्माविरोधात उभे ठाकलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक का होऊ दिला नाही? तेव्हा कुठला धर्म आड आला होता? ते शूद्र होते म्हणून का? महात्मा फुले यांचा खून करण्याची सुपारी देण्यात आली. त्यांनी शिक्षणाचे दरावाजे खुले केले म्हणून ही सुपारी देण्यात आली होती का? सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर, अंगावर शेण फेकण्यात आलं, महिलांना शिक्षण दिलं म्हणून हे करण्यात आलं का? असे यावेळी आव्हाड सभागृहात म्हणाले. आपल्या भाषणात पुढे बोलताना, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला. त्यावरच सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आणि निलंबनाची मागणी केली.
जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या उल्लेखांचा विरोध करण्यात आला. मंत्री शंभूराज देसाई यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाबाबत आव्हाड यांनी केलेले दावे आम्ही पहिल्यांदाच ऐकतो आहोत, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे वक्तव्य करण्यात आले ते पटलावरून काढून टाकावे, अशी मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. तसेच पुढे सत्ताधारी आमदारांनी आव्हाड यांनी माफी मागावी त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली. ़विरोध वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार आव्हाड यांनी माफी मागितली.