अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला की मनसेशी युती? कल्याण-डोंबिवलीत राजकीय समीकरणे बदलणार?
नुकताच राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता महापौर पदाची निवड होणार आहे. मुंबईत नेमका कुणाचा महापौर बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार असल्याचे चित्र आहे.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. तर दुसऱ्याच दिवशी, 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे आता महापौर कोणत्या पक्षाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार असे म्हटले जात आहे.
ठाकरे गटाचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी
महायुतीला बहुमत असूनही महापौर पदावरून भाजप–शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये महापालिकेतील घडमोडींना मोठा वेग आला आहे. येथे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे पक्ष ठाकरे गट व मनसेच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पालिकेतील सत्ता स्थापनेला 62 मतांची गरज आहे. येथे भाजपच्या 50 जागा आहेत तर शिवसेनेच्या 53. त्यामुळे महापौर पदासाठी भाजपला 12 तर शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे. दोन्हीही पक्ष आता इतर पक्षांतील नगरसेवक फोडण्यासाठी बार्गेनिंग करत आहेत. या घडामोडी सुरु असताना ठाकरे गटाचे 9 नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवलीत राजकीय समीकरणे बदलणार?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरेंचे 11, मनसेचे पाच, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 असे एकूण 19 नगरसेवक आहेत. यामधील शिंदे गटाचा ठाकरे गटाच्या 3 नगरसेवकांशी संपर्क सुरु आहे. तर देखील देखील शिंदेंना पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे 9 नगरसेवक अज्ञात ठिकाणी सुरक्षित आहेत. या सगळ्यात भाजपने सायलेंट भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी महायुती टिकवण्यासाठी अडीच-अडीच वर्षांचा महापौर अशी मागणी केली होती. त्यामुळे आता भाजप पुन्हा एकनाथ शिंदेसोबत हा फॉर्म्युला आणणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शिंदेंचा मान ठेवण्यासाठी भाजप ठाकरे गटासोबत युती करण्याऐवशी मनसे सोबत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण-डोंबिवलीत राजकीय समीकरणे बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
