
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता कल्याणमध्ये एका शेतकऱ्याला एकाने करोडोंचा गंडा घातल्याचे पाहायला मिळत आहे. देशी दारु दुकानाचे लायसन्स नावावर करून देण्याच्या बहाण्याने तब्बल १.४४ कोटींची फसवणूक केली आहे. कल्पेश तरमाळे असे या आरोपीचे नाव आहे. सध्या पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात राहणारे शेतकरी निलेश वारुळे हे कल्याणमध्ये वास्तव्यास होते. एकदा निलेश वारुळेंची ओळख कल्पेश तारमळेशी झाली. त्यानंतर कल्पेशने निलेश यांना पनवेलमधील मस्तानी नावाच्या देशी दारू दुकानाचे लायसन्स त्यांच्या नावावर करून देण्याचे आमिष दाखवले. हे लायसन्स मूळ मालक मुकुंद म्हात्रे यांच्या नावावर होते. हे काम पूर्ण करण्यासाठी कल्पेशने २४ जुलै २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत वारुळे आणि त्यांच्या भावाकडून टप्प्याटप्प्याने एकूण १ कोटी ४४ लाख रुपये घेतले.
सुरुवातीला, कल्पेशने लायसन्सच्या मूळ मालकाला ६१ लाख रुपये दिल्याचे सांगितले. मात्र उर्वरित रक्कम दिली नाही. त्यामुळे लायसन्स हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वारुळे यांनी आपले पैसे परत मिळवण्यासाठी कल्पेशकडे सतत पाठपुरावा केला. तेव्हा, कल्पेशने वारुळे यांना दोन चेक दिले. यातील पहिला चेक हा सारस्वत बँकेचा ४ लाख रुपयांचा होता. जो ९ एप्रिल २०२५ रोजी खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाला. यानंतर १ मे २०२५ रोजी चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा ५३ लाख रुपयांचा दुसरा धनादेशही खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे परत आला.
यानंतर निलेश वारुळे यांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. लायसन्स हस्तांतरित न केल्याने आणि पैसेही परत न केल्याने कल्पेशने जाणीवपूर्वक यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी, निलेश वारुळे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कल्पेश तारमळेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारांपूर्वी संबंधित व्यक्ती आणि कागदपत्रांची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः, परवान्यांसारख्या संवेदनशील बाबींमध्ये अधिकृत माध्यमांचा वापर करणे आणि थेट संबंधित सरकारी विभागांशी संपर्क साधणे सुरक्षित ठरू शकते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.