मोठी बातमी! मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?

कल्याणमध्ये दोन परप्रांतीय कुटुंबाकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती, या प्रकरणातील आरोपींना आता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोठी बातमी! मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?
| Updated on: Dec 21, 2024 | 4:35 PM

कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स इमारतीमध्ये दोन परप्रांतीय कुटुंबामध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या  धीरज देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबाला या दोन कुटुंबांकडून शिविगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे बाहेरून माणसं बोलावून त्यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं. याचे पडसात विधानसभेत देखील उमटले.

दरम्यान या प्रकरणाता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी  अखिलेश शुक्ला त्याची पत्नी गीता शुक्ला यांच्यासह  सुमित जाधव, दर्शन बोराडे,  पार्थ जाधव आणि विवेक जाधव अशा सहा जणांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायाधीश एन. पी वासादे यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

ज्या हत्याराने मारहाण करण्यात आली ती हत्यार जप्त करण्यासाठी आणि इतर तपासासाठी तसेच आरोपींचे इतर कुठल्या गँगसोबत संबंध आहेत का? याचा शोध घेण्यासाठी आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली. तर दुसरीकडे मात्र आरोपींच्या वकिलाकडून दहा दिवसांच्या पोलीस कोठडीला विरोध करण्यात आला.

आरोपी 24 तासांपासून पोलिसांकडे आहेत, मात्र याकाळात काय तपास झाला हे नमूद करण्यात आलेले नाही. त्या ठिकाणी दोन घटना घडल्या मात्र त्यात नमूद नाही. गेल्या 24 तासात कोणताही तपास झाला नाही, माग  10 दिवसांच्या पोलीस कस्टडीची काय गरज आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. सीसीटीव्हीमध्ये आरोपींच्या हातात कुठलंही शस्त्र दिसत नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला.

आरोपींचं वकील पत्र घेण्यास मराठी वकिलांचा नकार 

दरम्यान या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती, त्यांना कल्याण न्यायालयात आज हजर करण्यात आलं. मात्र त्यांचं वकील पत्र न घेण्याचा निर्णय मराठी वकिलांनी घेतला.