या नवाबाला 365 बायका, एका दिवसात दिला 27 जणींना तलाक; नको ती गोष्ट…
नवाब वाजिद अली शाह, अवधचे शेवटचे नवाब, त्यांच्या 365 बायकांसाठी ओळखले जातात. इंग्रजांनी त्यांना पदच्युत केल्यानंतर आर्थिक अडचणी व इंग्रजांच्या हस्तक्षेपाचा निषेध म्हणून त्यांनी एकाच दिवशी 27 बायकांना तलाक दिला. हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून इंग्रजांविरोधातील एक प्रतीकात्मक राजकीय बंड मानला जातो.

लखनऊला नवाबांचं शहर म्हणून ओळखलं जातं. लखनऊमध्ये असंख्य नवाब होते. या नवाबांच्या कहाण्या आजही प्रचलित आहेत. त्यातील काही खऱ्या आहेत. तर काही दंतकथा आहेत. पण लखनऊचे शेवटचे नवाब वाजित अली शाह यांच्याबाबतची एक कहाणी समोर आली आहे. यापूर्वी कुणीही ही कहाणी ऐकली नसेल. क्वचितच कुणाला माहीत आहे. या नवाबाला 365 बायका होत्या. त्यापैकी 27 बायकांना त्यांनी एका दिवसात तलाक दिला होता. बायकांशी पटत नव्हतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला नव्हता. किंवा त्या नावडत्या होत्या म्हणूनही त्यांनी असं पाऊल उचललं नव्हतं. तर त्यामागचं वेगळंच कारण होतं.
सन 1856मध्ये इंग्रजांनी नवाब वाजिद अली शाह यांना अवधच्या सिंहासनावरून बेदखल केलं. त्यामुळे नवाब वाजिद अली शाह यांना नैराश्य आलं होतं. त्यांना इंग्रजांच्या या कृत्याची लंडनच्या महाराणी व्हिक्टोरीया यांच्याकडे तक्रार करायची होती. नवाब वाजिद अली हे त्यांची आई, भाऊ आणि मंत्र्यांसोबत कलकात्याला आले होते. तिथून त्यांना जहाजात बसून इंग्लंडला जायचं होतं. कलकात्याला येताना त्यांनी ‘बाबुल मोरा नैहर छूटो जाए’ हे प्रसिद्ध गाणं लिहिलं. पण कलकात्याला आल्यावर त्यांचं मन बदललं. पण त्यांची बेगम लंडनला रवाना जाली होतं. दुसरीकडे 1857च्या बंडाच्या काळात इंग्रजांनी घाबरून नवाब वाजिद अली यांना दोन वर्षासाठी फोर्ट विल्यममध्ये कैद करून ठेवलं. कारण अवधमध्ये नवाबाची लोकप्रियता होती. तिथे बंड होऊ शकतं, अशी भीती इंग्रजांना वाटली.
बंगला नंबर 11
तुरुंगातून सुटल्यानंतर वाजिद अली यांना इंग्रजांनी कलकात्याच्या हुगळी नदी किनारील मटियाबुर्जमध्ये बंगला नंबर 11 राहायला दिला. या अलिशान बंगल्यात चीफ जस्टिस राहिलेले होते. नवाबाने या बंगल्याचं नाव सुल्तान खाना ठेवलं. त्यांच्यासोबतचा काफिला मोठा होता. त्यांच्या 365 बायका, मुलं आणि नोकरचाकर होते. एवढ्या मोठ्या लोकांना राहण्यासाठी हा बंगला कमी पडला. त्यामुळे नवाबाला आसपासचे दोन बंगले भाड्याने घ्यावे लागले. त्यांनी मटियाबुर्जमध्ये छोटं लखनऊच स्थापन केलं होतं.
एक लाख पेन्शन…
इंग्रजांकडून त्यांना प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये पेन्शन दिली जायची. पण नवाबाची जीवनशैली भव्य होती. त्यामुळे हा पैसा त्यांना कमी पडू लागला. त्यातच त्यांची एक बेगम माशूक महलने इंग्रजांकडे नवाबाची तक्रार केली. नवाब माझ्या आईला भरण पोषणासाठी पुरेसे पैसे देत नसल्याचा तिने आरोप केला होता. त्यावर इंग्रजांनी नवाबाचं म्हणणं ऐकून न घेता माशूक महलचा खर्च अडीच हजार रुपये करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नवाबाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली.
अन् निर्णय घेतला…
इंग्रजांचा हस्तक्षेप आणि मनमानी व्यवहार त्यांना कदापि आवडला नाही. त्यांनी या आदेशाला विरोध करण्यासाठी एक धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी 31 जुलै 1878मध्ये पत्नी माशूक महलसह 27 बेगमांना एकाच दिवसात तलाक दिला. माझी आर्थिक स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे मी या बायकांचा खर्च उचलू शकत नाही, असं त्यांनी इंग्रजांना निक्षून सांगितलं. नवाबाने आर्थिक तंगीचं कारण दिसलं असलं तरी ते इंग्रजांविरोधातील एक सुप्त राजकीय बंडच होतं, असं इतिहासकार म्हणतात.
