Ketan Agarwal Murder Case : सिया आणि चेतन गुप्तपणे पुन्हा लोहगडावर, दोन रस्ते आणि… नेमकं काय घडलं?
केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी सिया आणि चेतनला गुप्तपणे लोहगडावर नेले. तिथे घडलेल्या घटनेचे नाट्यीकरण करत दोन्ही आरोपींकडून माहिती घेण्यात आली. दोन रस्ते, त्यांची नेमकी जागा आणि केतनला धक्का कसा दिला, यावर भर होता. यातून कटाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. सियाच्या आई-वडिलांचीही चौकशी लवकरच होणार आहे.

केतन अग्रवाल प्रकरणात आता पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे. या प्रकरणात सिया आणि चेतनसह चेतनच्या नोकरालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना कशी घडली? प्लान काय होता? हेतू काय होता? या कटात अजून कोण कोण सहभागी होते? सियाच्या आईवडिलांना या प्रकरणाची कल्पना होती का? आदी गोष्टींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सिया आणि चेतनला गुप्तपणे लोहगडावर नेलं होतं. तिथे काय काय घडलं याची माहिती पोलिसांनी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
केतन अग्रवाल हत्याकांड (Ketan Agarwal Murder) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. काल लोणावळा ग्रामीण पोलीस अत्यंत गुप्तपणे सिया आणि चेतनला घेऊन लोहगड किल्ल्याजवळ आले होते. काल आरोपींना घेऊन पोलीस सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन आले होते. दोन्ही आरोपी कोणत्या मार्गाने किल्ल्यावर आले होते, याची माहिती घेण्यासाठी पोलीस या दोघांना लोहगड किल्ल्यावर आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दोन रस्ते…
किल्ल्यापर्यंत येण्यासाठी दोन रस्ते आहेत. सिया कोणत्या रस्त्याने आली आणि चेतन कोणत्या रस्त्याने आला? याची संपूर्ण माहिती पोलिसांनी त्यांच्याकडून घेतली. त्यानंतर पोलीस त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दरम्यान, या प्रकरणात पोलीस लवकरच सियाच्या आई-वडिलांचा जबाबही नोंदवणार आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
कोण कुठे उभं होतं ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेवेळी कोण कुठे उभे होते, याची माहितीही पोलिसांनी घेतली. सिया आणि केतन कुठे उभे होते? चेतन कुठे होता? दोघांमध्ये काय इशारे झाले आणि केतनला धक्का कसा दिला गेला? याचीही माहिती घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तसेच लोहगड किल्ल्यावरील सेक्युरिटी गार्ड आणि इतरांशीही पोलीस बोलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पोलिसांकडून याला अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. ही घटना घडली तेव्हा आजूबाजूला आणखी कोणी होतं का? या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार कोणी होतं का? की घटना घडली तेव्हा या परिसरात कोणीच नव्हतं? याचीही माहिती पोलीस घेत असल्याचं सांगण्यात आलं.