राजकारण करणं म्हणजे एखादा लेख लिहिण्यासारखं नाही. त्यानं ते केलं म्हणून यानं हे करायचं. महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळालं आहे. 2019 साली बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून आम्ही निवडून आलो. त्यानंतर सत्येसाठी, कुणाच्या पदासाठी आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलो हे महाराष्ट्राला माहिती आहे. गद्दार आणि खोके हा विषय संपला आहे.. सत्ता असताना अजितदादा सोबत आले त्याचं कारण म्हणजे हे सरकार गतिमान आहे. 215 पेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहे, लोकसभा आणि विधानसभा देखील आमचीच आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
ज्यांचे आधीच अस्तित्व संपलेलं आहे. त्यांनी दुसऱ्याच्या अस्तित्वाची चिंता करू नये. जे अस्तित्वहीन झाले आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर बोलू नये. ज्यांचे कुणी ऐकत नाही. ज्यांना कुणी पाहत नाही. ज्यांच्या सभांना कोण बघत नाही. त्यांनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये, असं म्हणत उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कुणाच्या घराणेशाहीवर जाऊ नये. पण दागिने गहाण ठेवले म्हणजे त्यांच्याकडे किती श्रीमंती होती हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या घरातील कपडे इस्त्रीसाठी कुठं जायचं हे सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधी यांनी महिलांबाबत केलेलं वक्तव्य सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यावर पडदा टाकण्यासाठी हे कदाचित बोलले असतील. मात्र भारत जोडो यात्रेचा कोणताही फायदा होणार नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा मोठ्या संख्येने निवडून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 तारखेला सभा होणार आहे. आमच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.