इराण आता पाकिस्तानवर हल्ला करणार? शाहबाज शरीफ यांना थेट इशारा, पाकिस्तानात खळबळ
Iran Warns Pakistan : इराणने ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळ आहेत त्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. आता इराणने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे.

मध्य-पूर्वेत युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सतत हल्ले सुरू आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणने ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळ आहेत त्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानी बेसवरून इराणवर ड्रोन हल्ला केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता इराणने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराणचा पाकिस्तानला जागतिक सुरक्षेबाबत गंभीर इशारा
इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात झालेल्या चर्चेवेळी इराणने पाकिस्तानला जागतिक सुरक्षेबाबत गंभीर इशारा दिला आहे. इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पेजेश्कियान यांनी म्हटले की जर आंतरराष्ट्रीय समुदाय युद्धासाठी जबाबदार असलेल्या पक्षांना शिक्षा करण्यात अपयशी ठरला, तर जागतिक व्यवस्था पूर्णपणे धोक्यात येऊ शकते. संघर्षामागील खरे जबाबदार घटक दुर्लक्षित केल्यास आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणखी अस्थिर होईल असं इराणने म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानने जर अमेरिकेला मदत करण्याची भूमिका घेतली तर इराणकडून पाकिस्तानवरही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाकिस्तान तटस्थ राहू शकेल का?
या युद्धाबाबत पाकिस्तानने आतापर्यंत उघड भूमिका जाहीर केलेली नाही. पाकिस्तानला वाटत होते की डोनाल्ड ट्रम्प यांची उघडपणे स्तुती करणे, सौदी अरेबियाला ठाम आश्वासने देणे आणि इराणला फोन कॉल व सौम्य भाषा वापरून शांत ठेवले जाऊ शकते. काही काळ हा फॉर्म्युला चालत होता. मात्र आता अमेरिका आणि इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना ठार मारले. त्यानंतर आखाती देशांमध्ये हल्ले होऊ लागले. युद्ध भयंकर पेटले. यामुळे पाकिस्तानची योजना फ्लॉप ठरली.
पाकिस्तानसमोर तीन मोठी आव्हाने
शहबाज शरीफ यांच्या पाकिस्तानला आता एकाच वेळी तीन मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पहिली अडचण म्हणजे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार आहे, त्याचे संरक्षण करणे. कारण इराणकडून सौदीवरही हल्ले होत आहेत, त्यामुळे ही परिस्थिती सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे.
दुसरे आव्हान म्हणजे अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर जगभरातील शिया लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानची एकूण 20 टक्के लाकसंख्या शिया आह. त्यामुळे या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवणे हे मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर सर्वात मोठं आव्हान म्हणजे, असं कृत्य टाळणे ज्यामुळे अमेरिका नाराज होईल. अमेरिका नाराज झाल्यास पाकिस्तानला भविष्यात संकटाचा सामना करावा लागू शकतो.
