अरे देवा…! गणपतीचे बुकिंग अवघ्या काही मिनिटांत फुल्ल, चाकरमान्यांना वेटिंग तिकीटही मिळेना, आता पर्याय काय?

ganesh festival : गणेशोत्स्वात कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. रेल्वेचं गणपतीचे बुकिंग अवघ्या काही मिनिटांत फुल्ल झालं आहे.

अरे देवा...! गणपतीचे बुकिंग अवघ्या काही मिनिटांत फुल्ल, चाकरमान्यांना वेटिंग तिकीटही मिळेना, आता पर्याय काय?
| Updated on: Jul 13, 2026 | 9:05 AM

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकिटे फुल्ल झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्टदेखील संपली आहे. त्यामुळे कोकणवासीयांची चिंता वाढली आहे. बाप्पााच्या सर्व दर्शनासाठी गावी जायचे कसे, असा मोठा प्रश्न कोकणवासीयांसमोर उभा राहिला आहे.

कोकणात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी ठाणे जिल्हा, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर तसेच मुंबई महानगर प्रदेशातील लाखो चाकरमानी गावी जातात. य गणेशोत्सवासाठी रेल्वे सुटण्याच्या 60 दिवसआधी रेल्वे तिकीट आरक्षित करण्यात सुरुवात झाली आहे. यानुसार 10 जुलैपासून 8 सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे 11 जुलै रोजी 9 सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यात येत होते. परंतु बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत कोकणकन्या, मंगळुरू एक्स्प्रेससह प्रमुख गाडयांच्या सर्व जागा फुल्ल झाल्या आहेत.

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या 8 आणि 9 सप्टेंबर रोजीची वेटिंग लिस्ट वाढत चालल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे नियमित आरक्षणातून तिकीट मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे बोलले जात आहे. 9 सप्टेंबर रोजीची वंदे भारत ट्रेनची तिकिटे वेटिंग लिस्टवर गेली आहे. त्यात ही लिस्ट वाढत चालली आहे

जनशताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे-मडगाव एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस या सर्व ट्रेनची वेटिंग लिस्ट वाढत चालली आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस, मंगळुरू एक्स्प्रेस, सुरत-मंगळुरू एक्स्प्रेस, पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेस या गाड्यांची 9 सप्टेंबर रोजीची वेटिंग तिकीट मिळणेही बंद झाले आहे. रेल्वे तिकीट बुकिंग फुल्ल झाल्यामुळे चाकरमान्यांना एसटी महामंडळाचा आधार घ्यावा लागणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ देखील जादा बसेस सोडण्याची शक्यता आहे. रेल्वेचं तिकीट न मिळालेल्या चाकरमान्यांना एसटी बसने जाणे परवडू शकते. मागील वर्षी एसटी महामंडळाने कोकणासाठी 5 हजार जादा बस सोडल्या होत्या. यंदा सरकारकडून काय निर्णय घेण्यात येतो, हे पाहावे लागेल.

Follow Us