
उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेवर बोलताना मोठी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी यावेळी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘गेल्या वर्षी अर्थसंकल्प मांडताना अजितदादा म्हणाले होते, विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. अतिशय स्थितप्रिय आणि आर्थिक घडी कशी बसवायाची, आणि प्रसंगी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील आपल्या सहकाऱ्यांना आर्थिक बाबींबद्दल आजितदाद स्पष्टपणे सांगत होते. गेले 25 -30 वर्ष अजितदादांसोबत काम केलं, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, खरं म्हणजे आता अजितदादांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. महाराष्ट्राला पुढं न्यायाचं आहे. यावेळचं जे बजेट आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. ते देखील उत्तम अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांना महाराष्ट्रातील सर्व बाबांची माहिती आहे. राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहिती आहे, आणि मला विश्वास आहे, की त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल. गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही सर्व सामान्य माणसाचे सरकार म्हणून काम करत आहोत. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो, आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी लाडकी बहीण योजनेवर बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. ते विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही लाडक्या बहिणींच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं अश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं, यावर शिंदे बोलत होते. मला आठवतंय मी मुख्यमंत्री असताना मी देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही तिघांनी ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची. परंतु या योजनेसाठी येणारा खर्च हा 45 हजार कोटींपेक्षा जास्त होता. पण आम्ही ही योजना सुरू करण्याचं धाडस केलं. ही योजना सुरू केल्यानंतर राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी अजित पवार यांनी घेतली. ही योजना आम्ही यशस्वी केली, आणि ही योजना आज सुरू आहे, याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे.
लाडक्या बहिणींनी देखील आमच्या सरकारला आशीर्वाद दिला. काही लोक आज पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये द्या शब्द पूर्ण करा. काही दिवसांपूर्वी त्याच लोकांनी या योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम केलं होतं. त्यांना वाटलं की आम्ही फक्त निवडणुकी पूर्तीच घोषणा करत आहोत, पण आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत, जे बोलतो ते करून दाखवणारे आहोत. मी हे देखील सांगतो आम्ही विधानसभा निवडणुकीवेळी जो शब्द दिला होता, त्या घोषणा आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार आहोत, अशी घोषणा यावेळी शिंदे यांनी केली आहे.