Budget Session 2026 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होणार? महायुती सरकारकडून हालचाली
मोठी बातमी समोर येत आहे, उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होत आहे, या अधिवेशनामध्येच लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात महायुती सरकारच्या हालचाली सुरू आहेत.

सोमवारपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. याच अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी महायुती सरकाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याच अधिवेशनात राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा अशी हिंदू संघटनांची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. हिदुत्ववादी संघटनेच्या मागणीची दखल घेत सरकारी पातळीवर कायदा करण्यासाठी लवकरच कायदे तज्ज्ञाची बैठक होण्याची शक्यता आहे. गुजरातनंतर आता महाराष्ट्रात देखील लव्ह जिहाद विरोधी कायदा येण्याची शक्यता आहे.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
दरम्यान उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे, त्यापूर्वी आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती होती. विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार घालण्यात आला आहे. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना झालेल्या अपघातावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शहरी भाग असो अथवा ग्रामी भाग तुम्ही मला असा एक तरी जिल्हा दाखवला जो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम असेल असं थेट आव्हानच त्यांनी सरकारला दिलं. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, पिक विम्याचा एक रुपया मिळत नाही. शहरात तरुणांना रोजगार नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.
विरोधकांची कसोटी
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालामध्ये विरोधी पक्षांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता, आधी झालेल्या नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर त्यानंतर झालेल्या महानगर पालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील विरोधकांना चांगलाच धक्का बसला. महायुतीला मोठं यश मिळालं. या सर्व पार्श्वभूमीवर आता उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये विरोधकांची कसोटी लागण्याची शक्यता आहे. या अधिवेशन काळात विरोधक नेमके कोणते मुद्दे उपस्थित करतात ते पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.
