Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार? हसन मुश्रीफ यांनी थेटच सांगितलं, आर्थिक अडचणी…
महायुतीच्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी मुदत संपली असली तरी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी योजना बंद होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. आर्थिक अडचणी असूनही, ही योजना सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सतत काही ना काही चर्चा सुरूच असते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महीना 1500 रुपये मिळतात. मात्र योजनेतील गैरप्रकार उघडकीस आल्यावर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. त्याची मुदत काल (30 एप्रिल) रोजी संपली. आता या योजनेसंदर्भात महायुतीमधील मंत्र्यांनीच एक महत्वाचं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते , मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी-बहीण योजनेबद्दल मोठं विधान केलंय. ही योजना बंद होणाहर, अशा वावड्या अधूनमधून उठत असतात. मात्र आता त्यावर खुद्द महायुतीमधील मंत्र्यांनीच वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले हसन मुश्रीफ ?
नंदुरबार येथे बोलताना हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योनजेवरही भाष्य केलं. “लाडकी बहीण योजनेमुळे कुठल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाही आहे असं कुठेही निदर्शनास आलं नाही. लाडक्या बहिणी योजनेमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती चालू राहणार आहे. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. -या योजनेमुळे विकास कामांना निधी कमी मिळत आहे” असं म्हणत मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
अपात्र बहिणींकडून पैसे वसुली
लाडकी बहीण योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले. मध्यंतरी अशी चर्चा रंगली होती की लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते. मात्र असं काही होणरा नसून योजना सुरूच राहणारा असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. या योजनेत अनेक गैरप्रकारही झाले होते. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली करण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली. निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली करण्याचे काम सरकारकडून सुरू करण्यात आले. राज्यातील 12915 लाभार्थी हे अपात्र आढळून आले. पैकी 6457 महिलांकडून आतापर्यंत 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ माजली होती.
