
पुणे महापालिक निवडणुकीसाठी काल मतदान झालं. आज अद्याप मतमोजणीला सुरूवात व्हायची आहे, पण निकालाआधीच भारतीय जनता पार्टीच्या गणेश बिडकर यांचे पुण्यात महापौर साहेब अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेचे निवडणूक पार पडत असताना आज मत मोजणी दहा वाजता सुरुवात होणार आहे. राजीव गांधी भवन येथे ही मतमोजणी होणार आहे. 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात आहेत. काल सुमारे 70 टक्के मतदान झालं.
पुण्यात शिवसेना ही निर्णयाक ठरणार असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
अजित पवार गेम चेंजर आहेत. आम्हाला उमेदवारी देताना उशिर झाला. राजकीय डावपेच करता आले नाही. नाहीतर पुण्यात चांगले निर्णय घेता आला असता. युतीमुळे आम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागला, असंही त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांसाठी आभारपत्र लिहीलं आहे.
लोकशाहीचा हक्क बजावत उत्स्फूर्तपणे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो असं अजित पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
मतदान केंद्रांवर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असं म्हणत अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले .
पुण्यात एकूण 52.42 टक्के मतदान झालं. 163 जागांसाठी 52 टक्के इतके मतदान झालं. एकूण 35 लाखापैकी 18 लाख 62 हजार 408 जणांनी मतदानाचा हक्क बजावला . मागच्या वेळी पेक्षा जवळपास 3.50 टक्के कमी मतदान झालं. 2017 साली 55.56 टक्के मतदान झाले होते. पुण्यात कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला ? हे लवकरच कळेल.
निकालापूर्वीच सोलापुरात आमदारपुत्र किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मुलाचे बॅनर लागल्याने चर्चा सुरू आहे. ‘आम्ही भावी नाही पर्मनंट’ असा उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे. किरण देशमुख यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असाही बॅनरवर उल्लेख आहे. किरण देशमुख हे प्रभाग क्र. 2 मधून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी काल मतदान झालं. या महापालिकांसाठी एकूण 61.3 टक्के मतदान झालं. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत केवळ 41.79 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे दिसून आले.
2018 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 62.17 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घटल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
अजित पवारांच्या शहराध्यक्षांवर भाजपच्या महिला उमेदवाराचे आरोप, पालांडे-बहल वादाने राजकारण तापलं आहे. पिंपरी-चिंचवड भाजपच्या महिला शहराध्यक्षा आणि महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार सुजाता पालांडे यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा उमेदवार योगेश बहल यांच्या समर्थकांनी घुसखोरी केली आणि घरातील सदस्यांना शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पालांडे यांनी केला आहे.
मला याची अजिबात कल्पना नाही. मी अशा गोष्टी करत नाही, असं म्हणत बहल यांनी हे आरोप फेटाळलेत.
मात्र या घटनेमुळे राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
पिंपरी चिंचवड – शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट’वार’! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ माजली आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पश्चात कुटुंबातील वाद काही शमण्याचं नाव घेत नाही. पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप,अर्थात दिर–वहिणींमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानापूर्वी अश्विनी जगताप यांनी ‘निष्ठा की विश्वासघात?’ अशी हेडिंग देत व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवलं. आमदार शंकर जगताप यांनी ‘नमकहरामी’ व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप करत वहिणनींनी सोशल मीडियावरून जहरी टीका केली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
पिंपरी चिंचवड – महापालिकेच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत अंदाजे 60 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
Mahapalika Election Results : काल राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान झालं असून आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी झालेल्या मतदानाचे निकालही आज जाहीर होतील. या महापालिकांवर कोण विजयी पताका फडकावतो हे पाहणं महत्वाचं ठरेल
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होत्या. शेवटी निवडणूक आयोगाने निवडणुकांचे तारीख जाहीर केली. आज 29 महापालिकांचे निकाल लागणार आहेत.
आज होईल उद्या होईल म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीकडे गेल्या पाच ते आठ वर्षापासून मतदारांचं लक्ष लागलं होतं. अखेर तो क्षण आला आहे. काल पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी मतदान झाल्यानंतर आज या सहाही महापालिकांचा निकाल लागणार आहे. राज्यात ज्या 29 महापालिकांचा आज निकाल लागणार आहे. त्यातील सर्वाधिक महापालिका या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या महापालिकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सहापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि सांगली मिरज कुपवाड या चार महापालिका भाजपच्या ताब्यात होत्या. तर कोल्हापूर महापालिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. इचलकरंजी महापालिका नव्याने निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व महापालिकांच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व कायम राखण्यात भाजप यशस्वी ठरतो की या ठिकाणी वेगळा निकाल लागतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पुणे महापालिकेसाठी 162, पिंपरी-चिंचवडसाठी 128, सोलापूरसाठी 113, सांगली-मिरज-कुपवाडसाठी 78, कोल्हापूरसाठी 92 आणि इचलकरंजीसाठी 76 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदारराजा आज कुणाला कौल देतो, हे काहीवेळात स्पष्ट होणार आहे. या सहाही महापालिकांचे सेकंदा सेकंदासाठीचे अपडेट खालीलप्रमाणे…