दसरा मेळाव्याच्या दिवशी दुमदुमणाऱ्या भगवानबाबांची आज पुण्यतिथी, कोण होते भगवानबाबा? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 18, 2022 | 10:12 AM

भगवान बाबांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे हे पाचवे अपत्य. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव या गावात 29 जुलै 1896 रोजी त्यांचा जन्म झाला.

दसरा मेळाव्याच्या दिवशी दुमदुमणाऱ्या भगवानबाबांची आज पुण्यतिथी, कोण होते भगवानबाबा? वाचा सविस्तर
(फोटो सौजन्य- bhagwangad.in)
Follow us on

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कारकीर्दीत प्रसिद्धी झोतात आलेला अहमदनगर जिल्ह्यातील भगवानबाबा गड आजही दसऱ्याच्या दिवशी दुमदुमत असतो. समाजाला संघटित करण्यासाठी, राजकीय तोफा डागण्यासाठी या गडाचा सध्या वापर होत असला तरीही एके काळी मोठ्या आध्यात्मिक भक्तीभावानं या गडाचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. संत भगवानबाबांनी पूर्वीच्या या धौम्यगडाचा जीर्णोद्धार केला अन् तेव्हापासून त्याला भगवानबाबा गड म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

कोण होते भगवानबाबा?

भगवान बाबांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे हे पाचवे अपत्य. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव या गावात 29 जुलै 1896 रोजी त्यांचा जन्म झाला. असं म्हणतात की, आबाजीच्या जन्माच्या वेळेला गावात 108 दिवे लागले होते. लहानपणापासूनच अत्यंत चाणाक्ष बुद्धीमत्ता लाभलेल्या आबाजीला कामांचा प्रचंड उरक होता. शांत, निश्चयी असलेल्या आबाजीच्या घरात धार्मिक वातावरण होतं. त्यामुळे त्याला ज्ञानाची, विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. पंढरपूरच्या वारीत एकदा विठ्ठलदर्शन झाल्यावर आबाजीचे मन गहिवरले आणि त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले.

गुरुच्या आदेशानंतर मंदिराच्या शिखरावरून उडी मारली

(फोटो सौजन्य- bhagwangad.in)

आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे महंत माणिकबाबा यांचे उपासक होते. ते नेमाने माणिकबाबाची उपासना करत. आबाजीला घेऊन ते विजयादशमीच्या दिवशी एकदा नारायण गडावर आले. तेथे वडील तुबाजीरावांनी आबाजीला माणकिबाबच्या पायावर घातले. यावेळी आबाजीने माणिकबाबांना मला अनुग्रह द्या, असा हट्ट धरला. आबाजीने नारायणगडावरच राहण्याचा हट्ट धरला.अखेर माणिकबाबांनी आबाजीला तू नारायणगडाच्या मंदिराच्या शिखरावरून उडी मार असे सांगितले. आबाजीने काही क्षणातच उडी मारली. पण त्याला थोडेही खरचटले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले होते. त्याच्या साहसीपणाचे माणिकबाबांनी कौतुक केले. आबाजीला अनुग्रह दिला. तेव्हाच माणिकबाबांनी आबाजीचे नाव भगवान बाबा असे ठेवले.

पांढरे धोतर, पांढरा फेटा, शिस्तीचा अंगरखा!

भगवानबाबांची वेशभूषा तत्कालीन सामान्य माणसासारखीच होती. मात्र त्यात अत्यंत शिस्तबद्धता होती. साधे पांढरेशुभ्र धोतर, पांढरा सदरा, पांढरा फेटा ते वापरत असत. कधी गुडघ्यापर्यंत पोचणारा कोट घालत. रुंद, भव्य कपाळ, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ असा त्यांचा लहेजा होता. रुबाबदार मिशा, भव्य देहयष्टी, उंचेपुरे, तेजस्वी कांती व गौरवर्ण यामुळे ते भारदस्त वाटत. हातात काठी, पायात चप्पल किंवा बूट असा अत्यंत शिस्तीचा त्यांचा पोशाख होता.

नारायण गड ते भगवान गड

(फोटो सौजन्य- bhagwangad.in)

भगवान बाबांचे गुरु माणिकबाबा आयुष्याच्या अखेरच्या क्षणी आजारी होते. तेव्हा त्यांनी भगवानबाबांवर नारायणगडाची जबाबदारी टाकली. 1937 मध्ये माणिकबाबांनी आपला देह ठेवला. भगवानबाबा प्राणपणानं नारायण गडाची सेवा करू लागले. पण काही धूर्त लोकांनी त्यांच्यावर लोभाचा आळ घेतला. या सर्वातून विरक्ती आल्यावर भगवानबाबांनी हिमालयाकडे जाण्याचे ठरवले. पण खरवंडी येथील बाजीराव पाटील यांनी भगवान बाबांचे मन वळवले. त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील धौम्यगडावर घेऊन गेले. या ठिकाणी वास्तव्यास आल्यानंतर भगवान बाबांनी गावातील लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळवले. धौम्य ऋषींच्या पादुकांची सेवा करत त्यांनी धौम्यगडावर भक्तीचा गड उभारण्याचे काम सुरु केले. बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता हे बांधकाम केले आहे. येथील ओवऱ्यांसाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षांपासून पडलेले पाषाण आणले होते. लोक सहभागातून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गावाचा रस्ता बांधला.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ठेवले गडाचे नाव

पुढे 1958 मध्ये गडावरील देवळात विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गडाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1 मे 1958 रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले, ” धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा. तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले.

मानवतेचे पुरस्कर्ते, धर्मनिरपेक्षतेची शिकवण

भगवानबाबा हे मानवतेचे मोठे पुरस्कर्ते होते. जातपात, उच्चनीचता, जीतीभेद, धर्मभेद व पंथभेद दूर करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. समाातील चुकीच्या कालबाह्य प्रथा, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रुढी, परंपरा बुवाबाजी, गंडेदोरे, जातीभेद वर्णव्यवस्था दूर करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले. विद्यारुपी वाघिणीचे दूध कष्टकरी मुलांना मिळाले पाहिजे, या हेतूने त्यांनी शाळा, कॉलेजची स्थापना केली. अनेक वर्षे राज्यभरात कीर्तने, प्रवचने सुरु असताना भगवान बाबांनी समाजाचे जवळून निरीक्षण केले. अभ्यास केला. 1965 च्या प्रारंभी भगवानबाबांची प्रकृती खालावत चालली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेच 18 जानेवारी 1965 रोजी रात्री एक वाजता वयाच्या 69 व्या वर्षी भगवानबाबांनी जगाचा निरोप घेतला. महाराष्ट्राचे उत्तुंग कीर्तनकार व्यक्तीमत्त्व हरपल्यानं सर्वत्र शोककळला पसरली.

गोपीनाथ मुंडेंनी सुरु केली दसरा मेळाव्याची परंपरा

भागवानबाबांचे कीर्तन- (फोटो सौजन्य- bhagwangad.in)

भगवानबाबांनी धौम्यगडाचा जीर्णोद्धार केल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला होता. स्वतः मुंडे यांनी 35 वर्षे ही परंपरा सुरु ठेवली. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र 2016 मध्ये या मेळाव्याला वादाचे गालबोट लागले. गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिला. त्यामुळे वाद झाला. मात्र पंकजा यांनी पाथर्डी येथील भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं. 2017 मध्ये पंकजा यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी म्हणजे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली.पंकजांनी याच ठिकाणाहून नव्या परंपरेला सुरुवात केली.

इतर बातम्या-

कोरोनाची नियमावली पायदळी तुडवून इंदोरीकरांचं किर्तन; मनसेचे कार्यकर्त्यांचं आयोजन

Nagar Panchayat, ZP Election : 93 नगरपंचायतींसह, भंडारा-गोंदिया झेडपी, 195 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान