SSC Result 2026 : राज्यातील 179 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; कोणत्या शहराचे किती विद्यार्थी?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून राज्याचा एकूण निकाल ९२.०९% लागला आहे. १७९ विद्यार्थ्यांना १००% गुण मिळाले असून कोकण विभागाने बाजी मारली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत एकूण १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाराष्ट्र राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील एकूण १७९ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
कोणत्या शहरात किती विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळांपैकी विभागावार निकालात कोकण विभागाने ९७.६२ टक्क्यांसह राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर (८८.४१ टक्के) विभागाचा लागला आहे.
मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. संभाजीनगरमध्ये २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत.
| विभाग | १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी |
| छत्रपती संभाजीनगर | २४ |
| कोल्हापूर | १५ |
| पुणे | १२ |
| कोकण | ०७ |
| नाशिक | ०६ |
| मुंबई | ०५ |
| नागपूर | ०३ |
| अमरावती | ०३ |
निकालाची वैशिष्ट्ये
बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.९६ टक्के इतकी आहे. तर मुलांची ८९.५६ टक्के इतकी आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी जास्त आहे. तर राज्यातील ६,६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाराष्ट्रातील ४,२२,८९१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, तर ४,८२,२६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील तब्बल ९,९१२ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल ९१.२२ टक्के लागला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे. ते ९ मे ते २३ मे २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यंदा प्रथमच मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकत्रच मिळणार आहे. निकाल जाहीर झाल्यापासून १५ व्या दिवशी ते शाळेत उपलब्ध होतील. निकालामुळे येणाऱ्या तणावासाठी ‘टेलिमानस’ (१४४१६) आणि ‘मनोदर्शन’ (८४४८४४०६३२) या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विषेष म्हणजे यंदाच्या वर्षी सकाळी ११.३० वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत सात संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपला निकाल सविस्तर पाहता येणार आहे.