Maharashtra Breaking News in Marathi : प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा, त्या प्रकरणातील तपास बंद
Maharashtra Breaking News in Marathi : आज 28 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
आजच्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या… लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. तर बारामतीतून लोकसभा लढण्यावर ठाम असणार शिवसेनेचे नेते विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता आहे. तर तिकडे अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मात्र स्थानिक नेत्यांनी त्यांना कडाडून विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी तर प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयचा मोठा दिलासा
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका संदर्भातील घोटाळ्याचा तपास सीबीआयने बंद केला आहे. प्रफुल्ल पटेल हे यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते. तेव्हा त्यांच्यावर एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप होता. त्यांच्या या धोरणामुळे सरकारचं 840 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१७ ला सर्व कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता. प्रफुल पटेल गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीए मध्ये सहभागी झाले. त्यानंतर आता हा तपास बंद करण्यात आला आहे.
-
अभिनेता गोविंदा अहुजा यांचा शिवसेनेत प्रवेश
अभिनेता गोविंदा अहुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांनी गोविंदाला पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केलं. मला मिळालेली जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडेन, असं गोविंदाने म्हटलं.
-
-
समाजवादी पार्टी मेरठमधून उमेदवार बदलण्याची शक्यता
समाजवादी पक्ष मेरठमधून उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. पक्षाने येथून भानु प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांच्या जागी अतुल प्रधान आणि योगेश वर्मा यांच्यापैकी कोणाला तरी तिकीट मिळू शकते.
-
JJP हरियाणातील सर्व 10 जागांवर निवडणूक लढवणार: दुष्यंत चौटाला
लोकसभा निवडणुकीबाबत जेजेपी नेते दुष्यंत चौटाला म्हणाले की, पक्षाच्या पीएसीच्या बैठकीत जननायक जनता पक्ष सर्व 10 लोकसभा जागा ताकदीने लढवेल आणि त्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील परिस्थिती लक्षात घेता लोक उत्साहाने मतदान करतील आणि पक्षाचे कार्यकर्तेही जबाबदारीने मैदानात उतरतील.
-
इन्कम टॅक्स प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून काँग्रेसला झटका
आयकर प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून काँग्रेसला दणका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आयकर विभागाच्या चार वर्षांच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेच्या आदेशाला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका फेटाळली आहे.
-
-
केजरीवाल यांना त्रास दिला जात आहे, त्यांची प्रकृती ठीक नाहीः सुनीता केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांचा छळ केला जात आहे. त्यांची प्रकृती ठीक नाही. देशात सुरू असलेली हुकूमशाही रोखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
-
हिंगोलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफुस
हिंगोली-उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे लोकसभेची जागा गेल्याने महाविकास आघाडीमध्ये धुसफुस आहे. काँग्रेसचे पदाधिकारी सामुहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजत आहे. पारंपारिक जागा काँग्रेसची आहे. ठाकरे शिवसेनेकडे गेल्याने आम्ही राजीनामा देणार असल्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सूर आहे.
-
काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांचे सूचक ट्विट
शायरीच्या माध्यमातून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले. विशाल पाटील यांनी शायरी ट्विट केली.
रोके तुझको आँधियाँ या ज़मीन और आसमान, पायेगा जो लक्ष्य है तेरा लक्ष्य तो हर हाल में पाना है.
-
बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध फार वेगळे होते- सुशीलकुमार शिंदे
बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध फार वेगळे होते. बाळासाहेब माझ्याविरोधात प्रचारासाठी सोलापूरला आले आणि सभा न घेता हॉटेल मधून गप्पा मारून निघून गेले. मी मुख्यमंत्री असताना आमदारकी वेळी निवडणूक असताना बाळासाहेब भाषण न करता सोलापुरातून माघारी गेले . मैत्रीला पक्का असणार माणूस होते, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
-
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण जवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड
कल्याण : मुंबईकडून कल्याणला जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत. कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड. जलद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम. मध्य रेल्वे अर्धातास उशिराने धावत आहे.
-
नागपूरच्या चौदा मैल येथील एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला भीषण आग
नागपूर - अमरावती रोडवरील १४ मैल येथील एल ॲण्ड टी लॉजिस्टीक पार्कला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली आहे. लॉजिस्टीक पार्कमधून आगीचे प्रचंड लोट वाहत होते. त्यामुळे आग चांगलीच पसरली आहे. अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
-
हातकणंगलेमधून लोकसभा लढवायला डॉ. चेतन नरके यांचा नकार
चेतन नरके यांना महाविकास आघाडीकडून हातकणंगले येथून निवडणूक लढवण्यासाठी ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार देत कोल्हापुरातून अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
-
मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार - सुनील शेळके यांचा युटर्न
मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विरोध करणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी आता यूटर्न घेतला आहे. अजित पवारांनी मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा, असा आदेश देत बारणे हे महायुतीचे उमेदवार असतील याचे संकेत दिले आहेत. आता अजितदादा जे आदेश देतील, त्याचं पालन आम्ही करू, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेऊ, असे सुनील शेळके यांनी म्हटले आहे.
-
नवी मुंबईत पहाटे एकाच्या हत्येने खळबळ
नवी मुंबईत पहाटे एकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. वाशीमधील हॉटेल 'किनारा'बाहेर एकाची हत्या करून आरोपी फरार झाला आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. मृत व्यक्ती आणि जखमी हे हॉटेलचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. हॉटेलबाहेर उभे असताना दोघंजण बाईकवरून आले आणि त्यांनी हल्ला केला. हल्ला करून दोघंही पळून गेले. आरोपींची ओळख अजून पटली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
-
दापोलीतील साई रिसॉर्ट तुटणार नाही
दापोलीतील साई रिसॉर्ट तुटणार नाही. अनधिकृत भाग तोडण्याचे आदेश दिल्यानंतर मालक सदानंद चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत स्वखर्चाने अनधिकृत भाग तोडून घेतो असं स्पष्ट केलं. न्यायालयाने प्रतिज्ञापत्राला उत्तर देताना अनधिकृत बांधकाम स्वतःच्या खर्चाने काढण्यासाठी मुभा दिली आहे. CRZ च्या बदलत्या नियमवलीचा साई रिसॉर्टच्या विस्ताराला फायदा होणार आहे.
-
देशातील 600 वकिलांकडून सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र
नवी दिल्ली- देशातील 600 वकिलांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. देशातील एका समुदायाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयीन क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याची भीती व्यक्त केली आहे. वकील हरीश साळवे, उज्वला पवार यांच्यासह इतर वकिलांनी या पत्रावर सह्या केल्या आहेत.
-
नाशिकच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेची पुन्हा तातडीची बैठक
नाशिकच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेची पुन्हा तातडीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, शहराध्यक्ष प्रवीण तिदमे ही कोअर कमिटी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
हेमंत गोडसे यांची समजूत काढण्यात अद्यापही यश मिळालं नाही. नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास शिवसेनेत मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे. राज्यातील मराठा समाज महायुतीच्या विरोधात आक्रमक होऊ शकतो. असा अहवाल घेऊन ही कोअर कमिटी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.
-
पुढील दोन दिवस रात्रीही उकाडा
विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. पुढील दोन दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर प्रति चक्रवाताची स्थिती कायम आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे.
-
राष्ट्रवादी च्या पक्ष कार्यालयात सध्या शरद पवार आणि जयंत पाटील दाखल
राष्ट्रवादी च्या पक्ष कार्यालयात सध्या शरद पवार आणि जयंत पाटील हे दाखल झाले आहेत. बीडचे बजरंग बप्पा सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतील
-
हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित
हातकणंगले मतदार संघातून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्याची सूत्रांची माहिती.
2019 प्रमाणे राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात होणार मुख्य लढत
-
कोल्हापूर, रामटेक, अमरावतीची जागा आम्ही हसत हसत सोडली - संजय राऊत
कोल्हापूर, रामटेक, अमरावतीची जागा आम्ही हसत हसत सोडली. सांगली मधील काही व्यक्तींनी काही भूमिका घेतली आहे पण आमच्या सूचना आहेत, महाविकास आघाडी म्हणून कोणीही कटू भावना व्यक्त करू नये, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
-
धारावीत पैश्याच्या वादातून ३२ वर्षीय इसमावर जमावाकडून हल्ला
धारावीत पैश्याच्या वादातून ३२ वर्षीय इसमावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. संजीव कुमार बिंद नावाच्या इसमाला जमावाने केली मारहाण. दारूच्या नशेत हल्ला केल्याचा आरोप, मारहाण करून शिवीगाळ आणि धमकी दिली. धारावी पोलिसांनी मात्र केवळ अदखलपात्र तक्रार (एनसी) केली नोंद. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
-
पुण्यात एकावर कोयताने वार
जुन्या वादातून पाच ते सहा जणांकडून एकावर कोयत्याने वार करण्यात आले.पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना घडली. पाच ते सहा जणांकडून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आले. संपूर्ण प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. येरवडा पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
-
शरद पवार साताऱ्यातील उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता
सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार उद्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत जिल्ह्यातील शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, सारंग पाटील,खासदार श्रीनिवास पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर या नावांची चर्चा आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची शरद पवार यांच्याकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.
-
सोने महागले, चांदी झाली स्वस्त
सोने आणि चांदीत या आठवड्यात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहक बुचकाळ्यात पडले आहे. सोने महागले आहे तर चांदी स्वस्त झाली आहे. मार्च महिन्यात दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली आहे.
-
बच्चू कडू यांचा भाजपला चिमटा
भाजपने उमेदवारी दिली म्हणजे नवनीत राणांचा विजय होईल असं नाही आहे.बऱ्याच गोष्टी बाकी अजून, असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. उमेदवारी देऊन आमचा विजय होतो का की उमेदवार न देता नवणीत राणांचा पराभव करता येतो का हे पहावे लागेल. सक्षम उमेदवार असल्यास पाठिंबा देऊ किंवा दुसरा उमेदवार टाकू, असा चिमटा त्यांनी काढला.
-
केजरीवालप्रकरणात अमेरिकेची उडी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक व काँग्रेस पक्षाच्या अकाउंट गोठवण्याच्या वादात पुन्हा अमेरिकेने उडी घेतली आहे. आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. वेळेत पूर्ण होणाऱ्या योग्य व पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेचे समर्थन करण्यासाठी जाहीर भूमिका घेतल्याचे व्हाईट हाऊस प्रवक्ता मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे.
-
कोलकत्ता विमानतळावर धक्कादायक घटना
कोलकत्ता विमानतळावरील धक्कादायक घटना समोर आली आहे. ड्युटीवर असलेल्या सीआईएसएफ कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडली आहे. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॉन्स्टेबलच्या मानेला गोळी लागल्याचे समोर येत आहे.
-
पंजाबमध्ये भाजपचे एकला चलो रे
भाजपने पंजाबमध्ये स्वबळावरच लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यामुळे आता भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातील युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपने स्वबळाचा नारा दिल्याने आता पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागांसाठी 1 जूनला मतदान पार पडणार आहे. जे लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी अंतिम टप्प्यात होणार आहे.
-
National News : काँग्रेस नेते हरक सिंग रावत यांना ED चे समन्स
उत्तराखंडचे माजी मंत्री व काँग्रेस नेते हरक सिंग रावत यांना ED चे समन्स. 2 एप्रिल रोजी तपासासाठी हजर राहण्याचे निर्देश. वनजमिन हस्तांतरीत करणे तसेच कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील झाडांची अवैध कत्तल असे आरोप रावत यांच्यावर आहेत.
-
Maharashtra News : शेतकरी 'एफआरपी'च्या रक्कमेपासून वंचित
यंदाचा गळीत हंगाम संपत आला तरी अद्यापही 114 साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'एफआरपी'च्या रक्कमेपासून ठेवलं वंचित. फेब्रुवारीअखेर 206 पैकी 92 कारखान्यांनी 'एफआरपी' उत्पादकांच्या खात्यावर रक्कम जमा केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 846 कोटी रुपये कारखान्यांकडे थकित.
-
Maharashtra News : शॉर्टसर्किटमुळे लामकानावाडीतील तीन कुटुंबांचा संसार जळून खाक
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लामकानावाडी येथील तीन कुटुंब लग्न समारंभासाठी बाहेर गेले होते. त्यादरम्यान शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागली आणि या आगीत कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. यात 50 क्विंटल अद्रकीचे बेणे, 100 क्विंटलच्या वर कापूस, रोख रक्कम,सोने नाणे,कपडे आणि विद्यार्थ्यांची पुस्तके संपूर्ण जळून खाक झालं आहे.
-
पिंपरी महापालिकेचे पाच जलतरण तलाव अद्यापही बंदच
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची पाऊले पोहायला जाण्यासाठी जलतरण तलावाकडे वळत आहे. मात्र महापालिकेचे शहराच्या विविध भागातील 13 जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत. तर पाच तलाव अद्यापही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेने योग्य नियोजन न केल्यामुळे उन्हाळा सुरू झाला असतानाही पाच तलाव अद्याप कुलूप बंद आहेत.
-
शेतकरी 'एफआरपी'च्या रकमेपासून वंचित
यंदाचा गळीत हंगाम संपत आला तरी अद्यापही 114 साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 'एफआरपी'च्या रकमेपासून वंचित ठेवलं आहे. फेब्रुवारी अखेर 206 पैकी 92 कारखान्यांनी 'एफआरपी' उत्पादकांच्या खात्यावर जमा केली आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 846 कोटी रुपये कारखान्यांकडे थकित आहेत. राज्यात चालू हंगामात 824 लाख टन उसाचे गाळप झालं आहे.
-
स्मशानभूमीतला करणीचा अघोरी प्रकार समोर
स्मशानभूमीत मुलींचे आणि मुलाचे फोटो असलेले काळ्या कापडाचे पाच गाठोडे बांधले. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावाजवळील स्मशानभूमीतला करणीचा अघोरी प्रकार समोर आला आहे. गाठोड्यात नारळ,लिंबू,काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो व त्यावर धारदार दाभण खुपसून करणीचा अघोरी प्रकार केल्याचे समोर आलाय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संशयितावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी केलीय.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ
छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात वाढ झाली आहे. यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमान ३९.५ अंशावर तर किमान २२.४ अंशावर पोहोचला आहे. उकाडा वाढल्याने छत्रपती संभाजीनगरकर हैराण झाले आहेत. येत्या पाच दिवसात कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीने वर्तवली आहे.
Published On - Mar 28,2024 7:35 AM