
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील थबडेवाडी येथे तीन किलो गांजा जप्त करत एकास अटक करण्यात आली आहे.थबडेवाडीच्या स्मशानभूमी जवळ गांजा विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेच्या पथकाला मिळाली, त्यानंतर सापळा रचून दुचाकीस्वारास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे गांजा आढळून आला, त्यानंतर 72 हजार रुपये किमतीचा तीन किलो गांजा व दुचाकी असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर गुन्हे दाखल करत एकास अटक करण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेच्या विशेष महासभा अगोदर नाशिक महापालिकेची स्थायी समितीची बैठक पार पडली. गेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला होता. मात्र अनेक सदस्यांना अर्थसंकल्पात आणखी काही तरतुदी द्याव्या अशी मागणी केली होती. या मागणी संदर्भात चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत अर्थसंकल्पात अजून कुठल्या गोष्टींची तरतूद करावी या संदर्भात चर्चा होणार आहे.
मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या तापमानाचा 14 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर दुचाकीस्वारांनी उन्हापासून बचावासाठी तोंड व डोके झाकले आहेत. हवामान विभागाने पुढील 4-5 दिवस तापमान वाढत राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले. पाणी पिणे आणि उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला.
भाजपच्या राज्यसभा उमेदवार माया इवनाते यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, मी अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. गरिबीचे चटके काय असतात याची मला पूर्ण जाणीव आहे. काही महिन्यांपूर्वी मी सिद्धिविनायकाच्या चरणी मला एखादी संधी मिळावी, किमान आमदारकी तरी मिळावी अशी प्रार्थना केली होती. पण देवाने चक्क चमत्कार केला आणि मला थेट राज्यसभेची खासदारकी दिली. पक्षाने दाखवलेल्या या विश्वासामुळे मी भारावून गेली आहे. मला मिळालेल्या या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठीच करणार, असा ठाम विश्वास माया इवनाते यांनी व्यक्त केला.
आज अर्थसंकल्प सादर करताना दादांची खूप आठवण येत आहे. गेल्या २५ वर्षांपासून मी त्यांना अर्थसंकल्प मांडताना पाहत आलोय. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा राज्याच्या जनतेचे हित लक्षात घेऊन मांडलं जाणार आहे, असे आमदार आशिष जयस्वाल यांनी म्हटले. गोरगरीब शेतकरी कष्टकरीसाठी हा अर्थसंकल्प असेल. गुंतवणूकीवर राज्याचा जोर राहील. सर्व क्षेत्रात विकासाला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प राहील, असेही आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
अजित दादांच्या विमान अपघाताची २ तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. त्यांच्या अहवालातील ठळक मुद्दे मंत्रिमंडळासमोर आले तर आम्ही बोलू, असे शंभूराज देसाई म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. विटेकर म्हणाले की, यंदाचा १२ वा अर्थसंकल्प अजितदादा स्वतः सादर करणार होते, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होते. असे असले तरी, राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तरतुदी दादांनी आधीच करून ठेवल्या आहेत, ही बाब खुद्द मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली आहे. त्यामुळे आज सादर होणारा अर्थसंकल्प हा दादांच्या संकल्पनेतीलच असेल आणि यात मराठवाड्याच्या ज्वलंत प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल, अशी आशा राजेश विटेकर यांनी व्यक्त केली.
सोलापूर शहरासाठी गेल्या ६१ वर्षांपासून प्रलंबित असलेला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी हे महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार असून, आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्यक तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असून विद्यार्थ्यांसाठी शासकीय शिक्षणाची दारे खुली होणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी एक ट्वीट केले आहे. स्वर्गीय अजितदादांच्या विकास व्हिजनची यातून पूर्तता होईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आज राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
अर्थतज्ञ म्हणून देवेंद्र भाऊ यांची ख्याती आहे. आज स्व. अजितदादा असते तर त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असता, मात्र दुर्दैवाने दादा आपल्यात नाहीत.
या अर्थसंकल्पातून स्व.…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 6, 2026
डोंबिवली स्वामीनारायण सिटी–ठाणे माजिवडा २० रुपयांत बस सेवा, मात्र बस सेवा स्टेशनपासून दूर असल्याने प्रवासी नाराज. बस पकडण्यासाठी आधी ४० रुपयांचा रिक्षा प्रवास; प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया. बस सेवा ‘श्रीमंत वसाहतीं’साठीच सुरू केली का? सर्वसामान्य डोंबिवलीकर व नागरिकांना या बस चा फायदा काय संतप्त प्रवाशांचा प्रशासनाला सवाल. बस सेवा थेट डोंबिवली रेल्वे स्थानकावरून सुरू करा प्रवाशांची जोरदार मागणी
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल साडे नऊ वाजता सिद्धिविनायकचे दर्शन घेणार आहेत. अतूल सावे देखील सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले आहेत.
भुसावळ नशिराबाद रस्त्यावर निर्जन स्थळी घेऊन जात मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे…
राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन. आपल राज्य चांगले चालले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत ते सर्वासाठी असले पाहिजे. राज्यात अनेक संकट जरी असले तरी मुख्यमंत्री सक्षम आहेत हे सर्व दूर करण्यास अशा भावना अतुल सावे यांनी व्यक्त केल्या आहेत. सिद्धिविनायकांच्या दर्शना नंतर मंत्री अतुल सावे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनीधी विजय गायकवाड यांनी
३३६ महिलांच्या ३१ लाख १२ हजार १६४ रुपयांचा फसवणूकप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. बँकेच्या ५ माजी वसुली अधिकाऱ्यांनी ३३६ कर्जदार महिलांकडून हप्ते गोळा करून ती रक्कम बँकेत भरण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे पोलिसात दाखल तक्रारीत नमूद. बँकेच्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये हिशेबात वसुली झालेली रक्कम आणि बँकेत जमा झालेली रक्कम यात मोठी तफावत आढळून प्रकार उघडकीस. शाखा व्यवस्थापक मनीष चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकेच्या ५ माजी वसुली अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, ते आता तपास करणार आहे
मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस अगदी थोड्याचवेळात अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अजितदादां सारखीच कडक आर्थिक शिस्त दिसून येण्याची शक्यता आहे. काल सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे.
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 31 टक्के इतका आहे. तर स्टार्टअप क्षेत्रातही राज्याचा देशात सर्वाधिक म्हणजे 17 टक्के इतका वाटा आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार थेट परकीय गुंतवणुकीतही राज्याने मोठी आघाडी घेतली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन घेतले. आपलं राज्य चांगले चालले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत ते सर्वासाठी असले पाहिजे. राज्यात अनेक संकट जरी असले तरी मुख्यमंत्री सक्षम आहेत हे सर्व दूर करण्यास अशा भावना अतुल सावे यांनी व्यक्त केल्या आहेत.
राज्याच्या पायाभूत सोयी-सुविधांना गती मिळणार आहे. त्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो प्रकल्पासह बंदरे विकास, विमानतळ आणि औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.
विधानसभेत वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तर विधान परिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर केला. या अहवालात कृषी,उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वाढीमुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचा दावा केला आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. कारण यापूर्वी अनेकदा लाडक्या बहिणी योजनेचे मानधन 1500 रुपयांहून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात त्यासाठी काही ठोस आश्वासन देण्यात येणार का याची उत्सुकता लागलेली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडतील. कर्जाचा बोजा आणि महसूली तूट भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ होणार का याकडेही लक्ष लागले आहे.
महायुती सरकार आज शुक्रवारी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करणार आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय घडामोडींमुळे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडतील. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांच्याकडे वित्त खात्याची जबाबादारी आली आहे. वर्ष 2026-2027 अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन आता जवळ आली आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर सरकारने जून च्या आसपास कर्जमाफी करण्याविषयीचे आश्वासन दिले होते. आजच्या अर्थसंकल्पात याविषयीची काही घोषणा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांहून 2100 रुपये करण्यात येणार का, याकडेही राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. तर उद्योग जगतासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकताच दावोस दौरा केला. त्या पार्श्वभूमीवर उद्योगांसाठी अजून काही सवलती मिळतील का याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे. तर राज्याची महसूली तूट भरुन काढण्यासाठी आणि कर्जाचा वाढता डोलारा कमी करण्यासाठी खर्चात कमी करण्याचे अस्त्र राज्य सरकार बाहेर काढणार का याविषयीची चर्चा रंगली आहे.