Video | ‘गुजरातचा निरमा, भ्रष्टाचारी आया, भिगोया, धोया और Ok हो गया’, विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोध आक्रमक
आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातहून येते, असं वक्तव्य भाजप आमदार रमेश पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. तोच धागा पकडत आज विरोधकांनी हे आंदोलन केलं.
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) संपायला दोन दिवस शिल्लक असताना विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधक भाजप (BJP) विरोधात आक्रमक झालेले दिसले. गुजरातचा निरमा, क्लीन चिट मिळवा, पन्नास खोके, एकदम ओके, गुजरात निरमा, ईडी (ED), सीबीआय आयटी मागे नाही लागणार, वाशिंग मशीन खोके, महाशक्तीला पाठिंबा द्या आणि क्लिनचिट मिळवा, अशा घोषणा देत विरोधकांनी आज विधानभवन परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी केंद्र सरकार तसेच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्या नेृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
अंबादास दानवे काय म्हणाले?
विरोधकांच्या आंदोलनाची भूमिका अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘ भाजपने ज्या नेत्यांच्या विरोधात ईडी, सीबीआयच्या चौकशा सुरु केल्या होत्या, ते सगळे लोक आज सत्तेत बसले आहेत. त्यामुळे भारतात प्रसिद्ध असलेल्या निरमा वॉशिंग पॉवडरनी या भ्रष्टाचारी, गद्दार लोकांना धुतलं गेलंय. सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच हे मान्य केलंय. गुजरातचा निरमा महाराष्ट्रात आणून भ्रष्टाचार्यांना स्वच्छ करून सरकार बनवलं म्हणून अशा भ्रष्टाचारी लोकांना स्वच्छ करून, त्यांना निरमा पावडरने धुवून प्रतिकात्मक आंदोलन केलंय. आजच्या घडीला महाराष्ट्रात हेच सुरु आहे. भाजपात गेलेले सगळे नेते पतीत पावन झाले आहेत. त्यामुळे आम्ही याचा निषेध व्यक्त केला.
कोण म्हणालं होतं गुजरातचा निरमा?
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रमेश पाटील यांनी यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आमच्याकडून गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज आहे, त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं वक्तव्य भाजप आमदार रमेश पाटील यांनी केलं होतं. भूषण देसाई आमच्याकडे आले आहेत. कुणीतरी सांगितलं की ४०० कोटींची एमआयडीसीच्या प्लॉटची फाइल आहे म्हणून ते इथे आलेत. पण तसं नाहीये. हे सरकार चांगलं काम करतंय, म्हणून ते इथे आलेत. खरं म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरातहून येते, असं वक्तव्य रमेश पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. तोच धागा पकडत आज विरोधकांनी हे आंदोलन केलं.
मुख्यमंत्री-पंतप्रधानांवरील अपशब्दाचा विरोध
तर विधानसभेत आज मुख्यमंत्री, विधिमंडळातील सत्ताधारी आमदार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यावरून मोठा आक्षेप घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच वीर सावरकर यांच्याविरोधात बोलणाऱ्यांवर कडाडून टीका केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या गटातील आमदारांना मिंधे, चोर अशी टीका करण्यावरून तीव्र आक्षेप नोंदवला.