छत्रपती संभाजीनगरच, औरंगाबाद नाहीच; सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
नामांतरविरोधी संघटनांसाठी ही मोठी चपराक समजली जात आहे. यामुळे नामांतरविरोधी संघटना, विशेषतः एमआयएम पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : औरंगाबाद (Aurangabad) शहाराच्या संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतराला विरोध करणाऱ्यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडूनही फटकारलं आहे. नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर नामांतरावाचा ठराव मंजूर केल्यानंतर नुकतीच केंद्र सरकारनेही या प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यानंतर नामांतरविरोधी संघटनांनी याविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निश्चय केला होता. नामांतराला आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. आज अखेर ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे नामांतरविरोधी संघटनांसाठी ही मोठी चपराक समजली जात आहे. यामुळे नामांतरविरोधी संघटना, विशेषतः एमआयएम पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्याकडून विभागीय आयुक्त, औरंगाबादला यांना देण्यात आलेल्या पत्राला, सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या पत्रानुसार, औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याला परवानगी देण्यात आली. याचिका कर्त्याच्या मते, १९९६ मध्येच औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याच्या प्रयत्नांना आव्हान देण्यात आलं होतं. त्यावेळी हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. कोर्टाने या प्रकरणात जैसे थेचा आदेश दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने अधिसूचना मागे घेतली होती. एका जनहित याचिकेमार्फत उच्च न्यायालयात नामांतराला पुन्हा एकदा आव्हान देण्यात आलं होतं. मात्र या याचिकेकडे दुर्लक्ष करत केंद्र सरकारने शहराच्या नामांतराला मंजुरी दिली, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
महापालिकेवरून औरंगाबाद नाव हटलं
शहराच्या नामांतर प्रक्रियेतील आज सर्वात महत्त्वाची घडामोड घडली. ती म्हणजे महानगर पालिकेच्या इमारतीवरील औरंगाबाद हे नाव काढून तिथे छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड लावण्यात आला. नामांतराची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हळू हळू सर्वच शासकीय इमारती, दुकानांवरील शहराची नावे बदलली जात आहेत. अनेक पाट्यांवर नागरिक स्वतःहून औरंगाबाद नाव पुसून तिथे छत्रपती संभाजीनगर नाव करत आहेत. आज शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची इमारत महापालिकेच्या बिल्डिंगवरील नाव बदलण्यात आले.
नामांतरविरोधी संघटना आक्रमक होणार?
सुप्रीम कोर्टातील नामांतरविरोधातील याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आता नामांतरविरोधातील संघटना आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात संभाजीनगर नामांतराविरोधात आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. मात्र त्याला विरोध म्हणून हिंदु संघटनांनीही शक्तिप्रदर्शन करायला सुरुवात केली होती. त्यानंतर शहरातील वातावरण अधिक संवेदनशील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आपण आंदोलन मागे घेत असून कायदेशीर लढाई सुरुच ठेवणार, अशी घोषणा खा. जलील यांनी केली होती. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता रहावी, याकरिता आंदोलन मागे घेण्यात आल्याचं खा. जलील म्हणाले. आता आजच्या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, हे पहावं लागेल.