महाराष्ट्र 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं विकासाचं व्हिजन
मनी 9 च्या फायनॅन्शियल फ्रीडम समिट 2026 ला सुरुवात झाली आहे. मनी 9 च्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही चौथी समिट आहे. या समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Money9 Financial Freedom Summit 2026: मनी 9 च्या फायनॅन्शियल फ्रीडम समिट 2026 ला सुरुवात झाली आहे. मनी 9 च्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही चौथी समिट आहे. या समिटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात टीव्ही 9 चे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
महाराष्ट्र वेगानं प्रगती करत आहे
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, आज महाराष्ट्र अतिशय वेगानं प्रगती करत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अतिशय गतीमान झाली आहे. आज महाराष्ट्र हा भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जर एका मिनिटासाठी आपण असं मानलं की महाराष्ट्र जर एक वेगळा देश असता, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही अनेक देशांपेक्षा मोठी अर्थव्यवस्था असती, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सर्वच क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर एक
त्यांनी या समिटमध्ये बोलताना पुढे म्हटलं की, परकीय गुंतवणूक असो, पायाभूत सुविधांचे प्रकल्प असो, रोजगाराची निर्मिती असतो, किंवा स्टार्टअप अशा जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे देशातील नंबर एकच राज्य आहे. पूर्वी जो विकास हा केवळ पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांपर्यंत मर्यादीत होता. तो विकास आता प्रत्येक जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. रोजगार वाढत आहेत. पूर्वी गडचिरोली, नंदुरबार, जळगाव, नांदेड या सारख्या जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक होत नव्हती. मात्र आता चित्र बदललं आहे, या जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.
महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
आम्ही 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर (5 लाख कोटी डॉलर)च्या अर्थव्यवस्थेचं स्वप्न पाहिलं आहे. त्या दृष्टीने आम्ही वाटचाल सुरू केली आहे. 2047 पर्यंत हा टप्पा सहज गाठला जाऊ शकतो. आम्ही महाराष्ट्र विकासाच्या व्हिजनची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली आहे. त्याबद्दल नंतर सविस्तर बोलले असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
