Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर दिली प्रतिक्रिया

"सरकारसाठी काही मागायची गरज नाही. त्याला आपल्या मनातल सर्व समजतं. राज्यात चांगला पाऊस व्हावा. शेती चांगली पिकावी. शेतकऱ्याच्या जीवनात आनंद मिळावा" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठूरायाच्या शासकीय पूजेनंतर म्हणाले.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर दिली प्रतिक्रिया
Pandharpur Vitthal Rukmini Temple
| Updated on: Jul 25, 2026 | 7:44 AM

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. पंढरीत आज भक्तीसागर उसळल्याच पहायला मिळत आहे. परंपरेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा केली. आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब महादेव माने आणि त्यांच्या पत्नी सौ प्रभावती बाबासाहेब माने या दांम्पत्याला मिळाला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला.

“आपल्या भक्तासाठी विटेवर ऊभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो. यावेळी 25 किमी रांग आहे, यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्या निमंत्रणाविना भक्त पायी प्रवास करुन येतो. ही माझी पूजा नाही, ही विठ्ठल भक्तांची पूजा केली. येणारा वारकरी हा शेतकरी आहे. तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातून येणारा वारकरी आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “या वर्षी 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. वीजबिल माफ केली. सर्वांना विनंती आहे पांडुरंगाच दर्शन घ्यायला अनेक लोक येतात. कितीही लोक आले तरी आता योग्य नियोजन केलं जाणार आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सरकारसाठी काय मागितलं?

“सरकारसाठी काही मागायची गरज नाही. त्याला आपल्या मनातल सर्व समजतं. राज्यात चांगला पाऊस व्हावा. शेती चांगली पिकावी. शेतकऱ्याच्या जीवनात आनंद मिळावा. मोदींनी दिशा देण्याकरता नवा अध्यास सुरु केलाय. त्यालाही आशिर्वाद मिळावा” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पंढरपूर कॉरिडॉरबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की, “यावर्षीच काम सुरु झालं पाहिजे. दोन ते अडिच वर्षात काम पूर्ण होणार. कॉरीडॉरनंतर वेगळे रुप प्राप्त होणार”

अराजकता तयार करणारेही तिथे दिसतात

पंढरपूर जिल्ह्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्यात किती जिल्हे करायचे विठुराया जेव्हा आदेश देणार तेव्हा आम्ही करु’. दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपीच्या विद्यार्थी आंदोलनावर मुख्यमंत्री म्हणाले की, “प्रश्नावर गांभिर्याने आंदोलन करणारे आहेत. तसचं राजकारण आणि हिंसाचार करणारे जाणिवपूर्वक अराजकता तयार करणारेही तिथे दिसतात”

ठाकरे बंधुंच्या मोर्चावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

“सर्वाना लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकारणात आपली जागा कशी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न आहे. पण माझ्या त्यांना त्यासाठी शुभेच्छा आहेत” असं मुख्यमंत्री फडणवीस ठाकरे बंधुंच्या मोर्चावर म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us