शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर काय? थेट म्हणाले…

पवारांच्या दुष्काळ पत्रावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाच्या उपाययोजना आधीच सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, थेट मदत, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. NDRF मदतीची वाट न पाहता, राज्य निधीतून तातडीने साहाय्य देणार आहे. सरकारने परिस्थिती गांभीर्याने घेतली असून पवारांच्या सूचनांचे स्वागत केलं आहे.

शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीस यांचं एका वाक्यात उत्तर काय? थेट म्हणाले...
Devendra Fadanvis
| Updated on: Sep 18, 2026 | 3:01 PM

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis0 यांना पत्र लिहीलं अपुऱ्या पावसामुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शरद पवारांनी या पत्रातून लक्ष वेधलं असून मुख्यमंत्र्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शरद पवारांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच निर्णय घेतले असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना आधीपासूनच सुरू असून, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही राज्य सरकारकडून करण्यात येणार आहेत. 5 ऑक्टोबरनंतर करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांच्या आधारे केंद्र सरकारकडे NDRF अंतर्गत मदतीची मागणी केली जाणार आहे. मात्र, NDRFच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारच्या निधीतून आपण राज्य सरकारच्या वतीने मदत करणार आहोत, त्याची आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असं त्यांनी नमूद केलं.  NDRFकडून मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार स्वतःच्या निधीतून खर्च करणार असून, त्यानंतर केंद्राकडून मिळणाऱ्या NDRFच्या निधीतून हा खर्च भरून काढला जाणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांना थेट मदत

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि आवश्यक त्या ठिकाणी चाऱ्याची गरज असेल, ते सगळं उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलं आहे.सध्याची दुष्काळाची जी परिस्थिती आहे, ती राज्य सरकारने गांभीर्याने घेतली असून, त्यावर आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शरद पवारांच्या पत्रावर मांडली भूमिका

शरद पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहे, त्यांनी पत्र पाठवून काही सूचना केल्या, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्याला मी कुठलही राजकीय रंग अथवा वळण देणार नाही. याबाबत सरकारने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, असं फडणवीस यांनू नमूद केलं. एवढंच नव्हे तर यापुढे त्यांनी आणखी काही सूचना किंवा सल्ले दिले, तर ते निश्चितपणे ऐकू, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

राहुल गांधींवर टीकास्त्र

यावेळी बोलताना फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. नराहुल गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसमधील लोकांनी विश्वास व्यक्त केलेला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. ते पराभव लपवण्यासाठी वेगळ्या मुद्द्यांकडे लक्ष वळवत असल्याची टीका फडणवीस यांनी केली. “जखम कपाळाला आहे, पण ते पट्टी गुडघ्याला बांधत आहेत,” अशी उपमा देत फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला हाणला. भारतीय जनतेला काय हवं आहे आणि जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी का आहे, हे ज्या दिवशी त्यांना समजेल त्यावेळी काँग्रेस पक्षाला निवडणुकांमधील पराभव थांबवता येईल, असं फडणवीस म्हणाले. एवढंच नव्हे तर, राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी आहे . भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करण्याचं काम राहुल गांधी सातत्याने करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. या संस्थांवरील लोकांचा विश्वास कमी झाला, तर लोकशाहीवरील आणि पुढे भारतीय संविधानावरील विश्वासही कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us