Pratap Sarnaik : तिकिट दरवाढ, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार या बद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्वाची माहिती
Pratap Sarnaik : आज केंद्र सरकारने लिटरमागे पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ केली. सहाजिकच या दरवाढीचा सर्वत्र परिणाम होईल. महागाई अजून भडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्यात पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचं आवाहन केलं होतं. अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं होतं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून जलवाहतूक जवळपास ठप्प आहे. जगातील 20 टक्के तेल वाहतूक या मार्गावरुन होते. इतका महत्वाचा जलमार्ग बंद असल्यास त्याचा किंमतीवर परिणाम होणं स्वाभाविक आहेच. जगात तेल टंचाई निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. त्याशिवाय इराणने आखाती देशांच्या तेल प्रकल्पांवर हल्ले केले. त्यामुळे तेल उत्पादनात घट झाली. परिणामी जगभरात महागाई वाढली आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर दबाव येतोय. भारतही याला अपवाद नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाची नीचांकी कामगिरी सुरु आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं होतं.
आज केंद्र सरकारने लिटरमागे पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ केली. सहाजिकच या दरवाढीचा सर्वत्र परिणाम होईल. महागाई अजून भडकणार आहे. “पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने आम्हाला जास्त फटका बसणार आहे. आम्ही सद्यस्थितीत दरवाढ केलेली नाही. पण भविष्यात दरवाढ करावी लागेल. तोटा सहन करू शकत नाही” असं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. “इलेक्ट्रिक बस साठी चार्जिंग स्टेशन तयार करतोय. आमच्या महामंडळाच्या बसेस चार्जिंग केल्यानंतर खासगी गाड्यांना चार्जिंग लावायला देणार” असं प्रताप सरनाईक म्हणाले.
त्यांच्यावर कारवाई होणार
“छावा नावाचा APP तयार करतोय. सर्वसामान्य एसटी कामगारांचा पगार वेळेवर देणार. कोणाचाही पगार थांबवणार नाही. मागील जी काही देणी आहेत ती पण दिली जाणार” असं त्यांनी सांगितलं. “सायबर सेल आणि डीजीना पत्रव्यवहार केला आहे. त्यांचा APP च बेकायदेशीर आहे. रस्त्यावर जे बेकायदेशीर बाईक चालवतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल” असं प्रताप सरनाईक बाईक टॅक्सीच्या मुद्यावर म्हणाले.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑनलाइन बैठक घेतली. धाराशिव जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुंबईत बोलवण्याऐवजी ऑनलाइन बैठक घेतली. धाराशिव जिल्ह्यातल्या विविध विषयासंदर्भात ऑनलाईन बैठकीतून आढावा घेतला.