प्रचलित पद्धतीने शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत म्हणजे एकप्रकारची टिंगल, एकनाथ खडसेंचा घरचा आहेर

| Updated on: Oct 01, 2021 | 11:56 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी 25 हजाराची मदत करण्याची मागणी खडसेंनी केलीय.

प्रचलित पद्धतीने शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत म्हणजे एकप्रकारची टिंगल, एकनाथ खडसेंचा घरचा आहेर
एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

जळगाव, हिरा ढाकणे : यंदाच्या पावसाळ्यात राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह दुष्काळी मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमिनही खरडून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अशावेळी पंचनाम्याचा सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडून होत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरी 25 हजाराची मदत करण्याची मागणी खडसेंनी केलीय. (Eknath Khadse demands up to Rs 25,000 per hectare for flood affected farmers)

नुकसान भरपाईसाठी महिना महिना विलंब लागत आहे. शेतकरी आज मोडलेला आहे. हेक्टरी 10 हजार ही मदतीची जी पद्धत आहे, म्हणजे एकरी 4 हजार रुपये मदत, ही त्यांची टिंगल करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे सरकारनं या सगळ्या परिस्थितीचा विचार करुन, कमीत कमी 20 हजार, 25 हजार हेक्टरी तरी मदत केलीच पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केलीय. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा – फडणवीस

पंचनामे होत राहतील. पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. मंत्री आणि प्रमुख लोकं गेले तर प्रशासन जागं होतं. लोकांना दिलासा मिळतो. कोण तरी आपलं ऐकतं हे लोकांना समजतं. मी सुद्धा उद्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन दिवस जाणार आहे. वाशिमपासून माझा दौरा सुरू होत आहे. सरकारला पूरपरिस्थितीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.

सर्व घोषणा हवेत विरल्या

राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्यावेळी केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची पूर्तता झाली नाही. कागदावरच घोषणा राहिल्या. ही वास्तविकता आहे. आमच्या सरकारने जो जीआर काढला होता. तशीच मदत देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. पण ती मदतही त्यांनी अद्याप दिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या- पटोले

मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला. या संकटातून बळीराजाला उभे करण्यासाठी त्याला मोठ्या आधाराची गरज आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करावीच, त्याचबरोबरच केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळवण्यासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

इतर बातम्या :

पिंपरी-चिंचवड पुन्हा काबिज करण्यासाठी शरद पवार मैदानात! आता भाजप काय रणनिती आखणार?

जयंत पाटलांकडून फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण! तज्ज्ञांच्या मतावर बोलणं टाळलं

Eknath Khadse demands up to Rs 25,000 per hectare for flood affected farmers