विधानपरिषद निवडणूक : महायुतीच्या जागावाटपाचा सस्पेन्स संपला, एका रात्रीत मोठा गेम; कोणाला किती जागा?

विधानपरिषद निवडणुकीच्या १७ जागांसाठी महायुतीचे जागावाटप अखेर अंतिम झाले आहे. भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी २ जागांवर लढणार असून, महायुतीचा '११-४-२' चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. सविस्तर माहितीसाठी नक्की वाचा.

विधानपरिषद निवडणूक : महायुतीच्या जागावाटपाचा सस्पेन्स संपला, एका रात्रीत मोठा गेम; कोणाला किती जागा?
mahayuti
| Updated on: May 31, 2026 | 11:09 AM

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचे जागावाटप अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या फेऱ्या, अंतर्गत मतभेद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यातील वरिष्ठ नेत्यांसोबतच्या मॅरेथॉन बैठकांनंतर तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत एकमत झाले आहे. उद्या सोमवारी १ जून २०२६ विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारी महायुतीच्या नेत्यांनी यावर अंतिम शिक्कामोर्तब केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा ११-४-२ असा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपने ११ जागा आपल्याकडे ठेवल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाला ४ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला २ जागा देण्यावर एकमत झाले आहे. मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देतानाच जागांच्या गुणवत्तेनुसार ही वाटणी करण्यात आली आहे.

भाजपची मोठी माघार आणि ११ जागांवर दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद विद्यमान आकडेवारीनुसार भाजपचे संख्याबळ राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे सुरुवातीला भाजप स्वतः १४ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होता. मात्र, महायुतीमध्ये बिघाडी होऊ नये आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीला रोखता यावे, यासाठी भाजपने ११ जागांवर लढण्याचा निर्णय घेतला.

आता यानुसार भाजप आपल्या कोट्यातील ११ जागांवर ताकदीचे उमेदवार उतरवणार आहे. यामध्ये नागपूर, अहिल्यानगर (अहमदनगर), धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि सातारा-सांगली या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील बहुतांश जागांवर भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे या जागा जिंकून विधान परिषदेतील आपले संख्याबळ भक्कम करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, असे बोललं जात आहे.

शिवसेनेच्या ४ जागा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत पक्षाचे अस्तित्व आणि ताकद वाढवण्यासाठी सुरुवातीला किमान ७ जागांची मागणी लावून धरली होती. यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा केली होती. या वाटाघाटीत शिवसेनेला अखेर ४ जागा मिळाल्या आहेत.

शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये प्रामुख्याने ठाणे (एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला), नाशिक, परभणी-हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश आहे. ठाण्याची जागा राखणे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचे आहे. या तडजोडीत शिवसेनेने कोकणच्या जागेवरील आपला दावा सोडला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर-जालना या एका जागेवर भाजप आणि शिवसेना यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती, त्यावरही अंतर्गत चर्चा करून मार्ग काढण्यात आला आहे.

राष्ट्रवादीची तडजोड

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुवातीला किमान ३ जागा हव्या होत्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पक्षाची ताकद पाहता त्यांनी या जागांवर दावा केला होता. मात्र, भाजप आणि शिवसेनेच्या जागांच्या गणितामुळे अखेर राष्ट्रवादीला २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे आणि कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) या २ जागांवर निवडणूक लढवणार आहे. पुणे हा अजित पवारांचा राजकीय बालेकिल्ला असल्याने ही जागा राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, तर कोकणात भाजप आणि शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादी ही जागा जिंकण्यासाठी रणनीती आखत आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना

या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (MVA) असा अत्यंत चुरशीचा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीने देखील आपले जागावाटप (काँग्रेस ८, शिवसेना ठाकरे गट ६, आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३) आधीच पूर्ण केले आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, स्थानिक पातळीवरील गणिते आणि फोडाफोडीचे राजकारण यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची ठरणार आहे.

Follow Us