भाजपकडून कोण जाणार विधान परिषदेत? हालचालींना वेग, 30 नावांची यादी दिल्ली दरबारी…
BJP : भाजपकडून विधान परिषदेवर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 6 जागांसाठी अनेकजण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. आता 30 जणांची नावे दिल्लीला पाठवली असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. त्यामुळे आता भाजपकडून विधान परिषदेवर कुणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 6 जागांसाठी अनेकजण इच्छुक असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भाजपकडून हालचालींना वेग
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला 30 जणांची यादी पाठवली आहे. यात काही माजी आमदार-खासदारांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
30 जणांची नावे दिल्लीला पाठवली
भाजपच्या 30 जणांच्या यादीत माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी या नेत्यांची नावं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असं बोललं जात आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनीही भाष्य केले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण त्याबरोबरच पुढील राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे. उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे. याबाबत आमची आज प्रदेशाध्यक्षांची चर्चा झाली ते उद्धवजींना भेटून आले, आमच्या आघाडीत समन्वय राहावा या दृष्टीने हे निर्णय होणे अपेक्षित आहे ती चर्चा आम्ही करतोय.