Maharashtra News LIVE : समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाचं महत्त्वाचं पाऊल
Maharashtra News LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडत आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं भीषण अपघात
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथं भीषण अपघात घडला आहे, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या चार जणांना जोराची धडक देत फरफटत नेले आहे. या अपघातात दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले आहे. रेणापूर ग्रामीण रुग्णालया जवळ हा अपघात घडला आहे. मोटारसायकल रस्ता ओलांडताना ट्रकने जोराची धडक देत, फरफटत नेल्याची ही घटना आहे .
-
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल उद्या येणार
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेत तीन बालकांचा होळपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला आठवडा पूर्ण झाला. आगीच्या घटनेचा तपास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा उद्या अहवाल येण्याची शक्यता आहे. आग कशामुळे लागली, त्या रात्री नेमकं काय झालं, या घटनेला जबाबदार कोण या बाबी अहवालातून समोर येणार आहे. आठ दिवसांपूर्वी पहाटे साडेतीन वाजता रुग्णालयातल्या नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला आग लागली होती.
-
-
त्र्यंबकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची मोठी गर्दी
नाशिक- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटे पासूनच राज्यभरातील भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात 2 लाख भाविक येण्याची शक्यता आङे.
-
मनपातील महापौरपदासाठी शिंदे सेनेचं ऑपरेशन ‘मिशन टायगर’ सक्रिय- सूत्र
मनपातील महापौरपदासाठी शिंदे सेनेचं ऑपरेशन ‘मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चार नेत्यांवर मिशन टायगरची जबाबदारी असून निलेश राणे, श्रिकांत शिंदे, राहूल शेवाळे आणि योगेश कदम यांच्यात सामना काॅल झाल्याची माहिती आहे. सव्वा वर्षानंतर महापौरपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे सेनेची संख्याबळ वाढवण्याची रणनीती आखणार आहे. ठाकरे गटातील नगरसेवकांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या भाजपकडे 88, शिंदे सेनेकडे 29 नगरसेवक तर ठाकरे सेनेकडे 64 नगरसेवक आहेत.
-
मराठ्यांच्या मराठा आरक्षणाचं काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरच्या माध्यमातून सवाल
भारतीय जनता पार्टी पक्षाची प्रदेश कार्यकारणीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडत आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने पुण्यातील टिळक रोडवर ठिकठिकाणी मराठ्यांच्या मराठा आरक्षणाचा काय असा सवाल बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विखे यांनी उत्तर द्या, अशी मागणी बॅनरच्या माध्यमातून केली आहे.
-
-
समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलीस विभागाचं महत्त्वपूर्ण पाऊल
समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलीस विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. महामार्गावरील चोरी, दरोडे तसंच लूटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष गस्त वाढविण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते दोन नवीन पोलीस वाहनांचं उद्घाटन करण्यात आले. या वाहनांद्वारे महामार्गावर नियमित गस्त घालून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जाणार आहे.
-
वांद्र्यात भरधाव गाडीची चिमुरड्याला धडक
मुंबई- वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिमुरड्याला धडक दिली असून या भीषण अपघातात चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. महिला ड्राइव्हर मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वांद्रे इथल्या मेहबूब स्टुडिओ परिसरात हा अपघात झाला. भरधाव इनोव्हा कारने 8 ते 9 वर्षांच्या मुलाला चिरडलं. अंश रवींद्र गुप्ता याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारचालक मेघा रावल यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली.
-
नाशिक- भोंदूबाबा अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
नाशिक- भोंदूबाबा अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांप्रकरणी अशोक खरात सध्या कारागृहात आहे. मार्चमध्ये भोंदू अशोक खरातला अटक करण्यात आली होती. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. सरकारने ॲड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून जून महिन्यात नियुक्ती केली होती.
पुढील काही दिवस महामुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 3 ते 10 सप्टेंबरदरम्यान कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज असून 1 जून ते 30 ऑगस्टदरम्यान पालघरमध्ये सरासरीहून अधिक पर्जन्यवृष्टी झाली. ठाणे, रायगड आणि मुंबईत सरासरीच्या आसपास पाऊस पडला. तर पुढील तीन ते पाच दिवस कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. जुलैमध्ये सरासरीहून अधिक पाऊस पडला होता, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मंदावला आहे. पावसाची तूट निर्माण झाल्याने काही भागांत उकाड्यात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेतील महापौरपदासाठी शिंदे सेनेचं ऑपरेशन ‘मिशन टायगर’ सक्रिय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. चार नेत्यांवर मिशन टायगरची जबाबदारी असून निलेश राणे, श्रिकांत शिंदे, राहूल शेवाळे आणि योगेश कदम यांच्यात काॅल झाल्याची माहिती आहे. यासह राज्य, देश-विदेशातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.