
वाशिम बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ३० रुपयांपर्यंत मिळणारे टोमॅटो आता १० ते २० रुपये किलोने मिळत आहे. तर पालकाची जुडी १० रुपयांना मिळत आहे. तसेच कोबी, बटाटा, वांगी आणि भेंडीचे दरही निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा भाव अत्यंत कमी असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
सोलापूरच्या माढा तालुक्यातील जाखले गावात शेतीच्या बांधावरून झालेल्या वादाचे रुपांतर एका भीषण हत्येत झाले आहे. धाकटा भाऊ उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड याने आपला मोठा भाऊ हनुमंत रघुनाथ गायकवाड (६८) यांच्यावर लोखंडी घणाने प्रहार करत त्यांची निर्घृण हत्या केली. जमिनीच्या बांधावरून दोघांमध्ये जुना वाद होता. ज्यातून धाकट्या भावाने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी उत्तरेश्वर गायकवाड याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. महापालिकेतील गटनेतेपद कोणाला मिळणार आणि जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्तेचे समीकरण कसे जुळणार, यावर या बैठकीत चर्चा होईल. तसेच, महापालिका निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेऊन संघटनेत फेरबदल केले जाण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २०० निवासी डॉक्टर या संपात सहभागी होणार आहेत. यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सेवांचा अभाव, वेळेवर पगार न मिळणे आणि रुग्णालयातील अपुरी सुरक्षा व्यवस्था अशा गंभीर समस्या डॉक्टरांना भेडसावत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने अखेर डॉक्टरांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
मुंबई महानगरपालिकेत आज विरोधी पक्षनेत्याची अधिकृत घोषणा होणार असून, नवनियुक्त नेते आजच आपला पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, प्रशासकीय पातळीवर या पदासाठीचे कार्यालय अद्याप पूर्णपणे तयार नसल्याचे समोर आले आहे. कार्यालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने तिथे अद्याप रंगाचा उग्र वास येत आहे, तसेच नेत्यांच्या दालनासमोर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आसनव्यवस्थेचे कामही अपूर्ण आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय मात्र वापरण्यायोग्य स्थितीत नसल्याने कामाच्या सुरुवातीलाच काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
बुलढाणा शहरातील भारत विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या दोन जिवलग मित्रांनी अवघ्या 48 तासांच्या अंतराने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी नमन अरुण राऊत याने, तर १२ फेब्रुवारी रोजी अथर्व वैभव राणे याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यातील एकाचे वडील कारागृह पोलीस आहेत, तर दुसऱ्याचे आई-वडील शिक्षक आहेत. एकाच वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी लागोपाठ टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक क्षेत्रात आणि पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या दोन्ही आत्महत्यांमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांसमोर या गूढ घटनांचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
जळगावच्या चोपडा-विरवाडा रस्त्यावर कारच्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू. तीन जण गंभीर जखमी. राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत अशी अपघातात मयत झालेल्या दोन्ही तरुणांची नावं आहेत. बंटी रविंद्र कोळी, राकेश भगवान राजपूत व विजय अमृत भोई हे तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरवाडे गावातील 5 तरुण कारने एका कार्यक्रमाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती.
अहिल्यानगर शहराजवळ असलेल्या भिंगार वारुळवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन. बिबट्या मानवी वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये घाबरट. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल. मात्र बिबट्या एका जागेवर थांबत नसल्याने मोठी धावपळ उडाली आहे.
बीडमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हाणामारीच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. बीड तहसील परिसरात संपत्ती खरेदी विक्रीतून एका बांधकाम व्यावसायिकाला तीन महिलांनी मारहाण केली होती. या सर्व घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. दरम्यान आता याच महिलांकडून पुन्हा हल्ला होऊ नये याची खबरदारी म्हणून बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या संरक्षणासाठी लेडी बाउन्सर्स नेमल्या आहेत.
माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. बेकायदेशीरपणे शासनाच्या सदनिका लाटल्या प्रकरणी सुनावणी. बनावट कागदपत्रे सादर केल्याचा कोकाटे यांच्यावर आरोप. सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने ठरविले होते दोषी. न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत शिक्षेवर कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात मिळवला होता अंतरीम जामीन. जामीनाची मुदत संपत असल्याने पुन्हा जामीन मिळावा यासाठी कोकाटे यांच्याकडून अर्ज. आज या अर्जावर केली जाणार सुनावणी.
आपत्तीग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी.. उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाचा निर्णय.. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील अकृषी विद्यापीठांसह, सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फायदा होणार..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ.. 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार..
राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता.. महावितरण कंपनीकडून राज्य वीज नियामक आयोगाकडे 20 ते 40 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर.. यासंदर्भात नागपूरमध्ये जनसुनावणी..
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ.. खडकी- हिसार, दौंड – अजमेर आणि सोलापूर – अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश.. रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांचा जनगणनेच्या कामाला विरोध.. विद्यापीठातील 23 अनुदानित विभागातील 82 प्राध्यापकांना जनगणनेचे काम देण्यात आल्याची माहिती.. मनुष्यबळ कमी असल्याने काम न देण्याची मागणी..
हिवाळा ओसरत असताना वाढत्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरातील प्रवेश मार्ग आणि रांगेच्या ठिकाणी ग्रीन नेट बसविण्यात आले आहे. या सुविधेमुळे थेट सूर्यकिरणांचा प्रभाव कमी होऊन भाविकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत वाढणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थानने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना झापले आहे. पुण्यात झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज आहेत. सांगितलेल्या गोष्टी न केल्याने राज ठाकरे नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. या पुढे दर आठवड्याला राज ठाकरे स्वत: पुणे मनसेचा आढावा घेणार. तसेच पराभवातून बाहेर पडत कामाला लागण्याच्या देखील सूचना दिल्या. येणाऱ्या काळात काम करत रहा कुठे ही कमी पडू नका… पुण्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचा… अशा ही सूचना राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीत दिल्या आहेत.
शिवभक्तांचा दर्शनावरून परत येताना वाहन पलटी झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर १७ प्रवासी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा जवळील घडली. १२ जण गंभीर तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. पाटाळा परिसरातील शिवभक्त मालवाहक वाहनातून भटाळा येथे त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना हे सर्वजण पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते पलटी झाले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
अमरावती जिल्ह्यात होळीच्या तोंडावर 50 हजार मेळघाटातील आदिवासी मजूर संकटात सापडले आहेत. दोन महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने आदिवासी मजुरांमध्ये संताप वाढला. अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी रखडली. मेळघाटातच 22 कोटी 28 लाख रुपये थकीत.चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर सर्वाधिक प्रभावित आहेत. होळी सण जवळ, पण मजुरांच्या हातात पैसे नाहीत. प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारांचा सन्मान करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत निवडणूक आल्यानंतर जिल्हाप्रमुख चरणराज चवरेंचा सत्कार केला आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी चरणराज चवरे यांच्यावर पालखी महामार्गात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता, मात्र या आरोपांनंतरही जिल्हाप्रमुख चरणराज चवरे हे निवडून आलेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्याचा कानमंत्र दिला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीनंतर एमएसआरडीसीला जाग आली आहे. अपघात टाळण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. सात जणांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील आणि सुखकर प्रवास कसा करता येईल याचा समिती अभ्यास करणार. भिवंडी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढविणाऱ्या भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली आहे. भाजपा पाठोपाठ शिवसेना सुद्धा महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार आहे. अशी घोषणा पक्षनेते प्रकाश पाटील यांनी केली आाहे. उन्हाळ्याची सुद्धा चाहून लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीत वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात खडकी- हिसार,दौंड – अजमेर सोलापूर – अजमेर या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे… राज्यातील इतर प्रमुख घडामोडींची अपडेट इथं पाहा…