
विधान परिषदेपाठोपाठ विधानसभेतही सातारा जिल्हा परिषदेतील राड्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे. मतदानापासून कुणाला वंचित ठेवू नका, असं मी म्हटलं होतं. मी पोलीस अधिक्षकांना फोन केला.”
धनगर समाजाच्या आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेसमोरील रस्ता अडवला आहे. धनगर आरक्षणावरून मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी आंदोलक करत आहेत. तर पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ठाणे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या रेंटल हाऊसिंग इमारतींमधील सदनिका पुन्हा पालिकेकडे जमा करण्याबाबतच्या नोटिसा स्थावर मालमत्ता विभागाने बजावल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः वर्तक नगर प्रभाग समिती परिसरातील अनेक लाभार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे सांगत महासभेत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट फटका पुनर्वसन करण्यात आलेल्या सुमारे १४०० कुटुंबांना बसणार असून, त्यांना बेघर होण्याची भीती सतावत आहे. पालिकेने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक या नोटिसा बजावल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, हक्काच्या घरासाठी आता हे रहिवासी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरजवळ असलेल्या एकलहरे येथे रात्रीच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने एका लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली, ज्यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील आई, वडील आणि आजी अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमी बालकांना तातडीने मंचर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एकलहरे परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने या धोकादायक वळणावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
नाशिकच्या अतिशय मोक्याच्या असलेल्या कॅनडा कॉर्नर परिसरात ‘प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्स’ अशी पाटी लावून स्वतःचे कार्यालय चालवणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पर्दाफाश झाला आहे. हे कार्यालय केवळ जमिनीच्या व्यवहारांसाठीच नाही, तर भक्तांना बोलावून त्यांच्यावर आघोरी विद्या वापरण्यासाठी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच कार्यालयामध्ये कोट्यवधींच्या जमिनींचे सौदे केले जात असताना दुसरीकडे भक्तांना दहशतीखाली ठेवून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. गेल्या काही दिवसांपासून हे कार्यालय बंद असून, परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने येथे भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आघोरी कृत्ये चालवली होती. सध्या या प्रकरणाने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये सध्या ६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण १२ मध्यम आणि ४५ लघु प्रकल्प असून, मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के साठा उपलब्ध आहे. विशेषतः जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या अक्कलपाडा धरणामध्ये सध्या ७३ टक्के साठा असून, वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे या साठ्यात वेगाने घट होत आहे. ही परिस्थिती पाहता, येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, सुमारे २५६ कोटी रुपयांचा विशेष टंचाई आराखडा तयार केला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ज्या मंत्र्यांचा स्वतःवरचा विश्वास ढळला आहे आणि जे अशा बुवा-बापूंच्या आहारी गेले आहेत, त्या सर्व मंत्र्यांसाठी सरकारने एक विशेष शिबीर आयोजित करावे, असा उपरोधिक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा आहे, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमीच अशा प्रवृत्तींना उत्तेजन दिले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. भाजपने वारकरी संप्रदायाला राजकारणात ओढले असून, भविष्यात खरातलाही भाजपमध्ये प्रवेश देऊन ‘शुद्ध’ करून घेतले जाईल, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नांदगाव येथे होणार आंदोलन. जोपर्यंत नुकसान भरपाई बाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही. मुंबई गोवा महामार्गावर ठिय्या आंदोलन शेतकरी करतील. जिल्हा प्रशासनाने 700 लोकांना नोटीसा दिल्या असल्या तरी आम्हाला फरक पडत नाही आम्हाला अशा पद्धतीचे गुन्हे नवीन नाहीत यापूर्वी सुद्धा आम्ही अनेक गुन्हे दाखल करून घेतले आहे राजू शेट्टी यांचा इशारा
शहरातील क्रांती चौक परिसरात सुरू असलेल्या ऑटो एलपीजी गॅस समोर ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा. शहरातील मुख्य रस्त्यावर लागल्या जवळपास एक किलोमीटरच्या दुहेरी रांगा. ऑटो एलपीजी गॅसच्या दरात 35 रुपये दरवाढ होऊनही गॅस मिळत नसल्याने ऑटो चालक अडचणीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ एकच ऑटो एलपीजी गॅस सुरू असल्याने गर्दी
पण आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार आहे कुठलाही हिंसक प्रकार आम्ही करणार नाही. मोहन भागवत यांनी आमचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजेत आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती आमचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं एवढा पोलीस बंदोबस्त लावण्याची काय गरज.
मिरगाव परिसरात अनेक वर्षे दहशत निर्माण केल्याचा आरोप…सकाळी दहा ते बारा किलोमीटर सायकलिंग करत होता. सायकलिंग करतेवेळी कंबरेला बंदूक लावून फिरत असल्याची स्थानिकांची माहिती…दहशतीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या, खोटे गुन्हे दाखल केल्याचेही आरोप…तर कालच त्याच्या फॉर्म हाउस येथील वॉचमन, कर्मचारी, मंदिराच्या पुजाऱ्याची चौकशी करण्यात आली
नाशिकचा भोंदूबाबा खरात याचा मुद्दा अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. घरात याच्या विरोधात तक्रार करण्याकरिता अनेक महिला पुढे आल्या आहेत.
नवापूर शहरात एक अनोखी आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. बस स्थानकासमोर असलेल्या एका निंबाच्या झाडातून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अगरबत्तीप्रमाणे धूर निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून, काहीजण याकडे दैवी चमत्कार म्हणून पाहत आहेत. झाडाच्या शेंड्याकडून अचानक धूर निघताना दिसल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. अनेकांनी श्रद्धेने या घटनेकडे पाहत दर्शनासाठीही गर्दी केली. मात्र, यामागे वैज्ञानिक कारण असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. परंतु झाडाच्या बुंध्याजवळ बाबाचा दर्गा असून, तेथे नियमितपणे दिवाबत्ती आणि अगरबत्ती लावली जाते. याच आगीमुळे झाडाच्या आतील भागात हळूहळू आग लागून ती काही दिवस साचत राहिली आणि अखेर शेंड्याकडून धूर बाहेर येऊ लागला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संस्थानचे अध्यक्षपद भोंदू अशोक खरातकडे होते. काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती केली होती. खरातने पत्नी आणि निकटवर्तीयांना विश्वस्तपदी बसवले होते. रुपाली चाकणकरही या संस्थानवर ट्रस्टी होत्या. विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट २०२५ मध्येच संपल्याचा खुलासा रुपाली चाकणकर यांनी केला होता. खरात अटकेत गेल्यानंतर विश्वस्त मंडळाचा फलकही गायब झाला आहे. SIT कडून संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंदिर संस्थानमधील कारभार आणि आर्थिक व्यवहारही तपासाच्या रडारवर आहेत.
तक्रारदार महिला आणि प्रियकराचा कट पोलिस तपासात उघड झाल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी आरोपी प्रियकरावर दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीवर दबाव आणण्यासाठी हा बनाव रचला होता. यामध्ये आरोपी प्रियकर आणि प्रेयसीने डायल 112 वर कॉल करून माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सीडीआर तसेच सीसीटीव्हीची तपासणी केली असता ही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी प्रियकर आणि महिलेवर भारतीय न्याय संहिता कलम 248, 217, 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. विजापूर नाका पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
शरद पवार यांची मवीआ कडून राज्यसभा खासदार म्हणून निवड केल्याच्या निमित्ताने आभार प्रकट करण्यासाठी या डिनर डिप्लोमेसी चा आयोजन करण्यात आल आहे. आज संध्याकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये डिनर डिप्लोमेसीचा आयोजन करण्यात आलं. या डिनर डिप्लोमेसी मध्ये काही राजकीय चर्चा होणार का हे पाहण महत्वाच आहे…
साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेचा चैञ पोर्णिमा उत्सव ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे. या कालावधीत तीन दिवस तुळजाभवानी मंदीर २२ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. तर ३१ मार्च ते २ एप्रिल कालावधीत मंदीरात छबिन्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. चैञ उत्सव कालावधीत राज्यभरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
भोंदू बाबा अशोक खरात आणि पोपटराव पवार यांच्या व्हायरल व्हिडिओ नंतर पोपटराव पवारांनी मोठा खुलासा केला आहे. 2012 साली हिवरे बाजार येथील मंदिराच्या जिर्णोद्धराचे जे काम हाती घेतले त्याच कामगारांनी अशोक खरातच्या ईशान्येश्वराच्या मंदिराचे काम केले. त्यामुळे घराचा संपर्क आला होता, त्यानंतर कुठलाही संबंध आला नाही. मंदिराच्या व्यतिरिक्त कुठलाही संबंध आला नाही, भोंदूगिरीशी आमचा कुठलाही संबंध नाही…
श्री तुळजाभवानी मंदिर येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवीस उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून ‘पंख्याने वारा घालण्याची’ पारंपरिक सेवा सुरू करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सेवा चैत्र महिन्यापासून दुपारी 1 ते 4 या वेळेत हाताने पंखा हलवून सेवा करण्यात येते. देवीला लिंबू सरबत, फळे व पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करून मखमली पंख्याचा वापर
ही मानाची सेवा पारंपरिकरित्या तुळजापूरातील पलंगे कुटुंबाकडे असून, अनेक पिढ्यांपासून ती अखंड सुरू आहे. मृग नक्षत्रातील पावसाळा सुरू होईपर्यंत ही सेवा चालणार आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिंदे यांच्या शिवसेना चे एका शिवसैनिकाने पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाषा वापरत ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना थेट धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.. “कोणीही असू द्या, आमदारालाही ओढून मारू,” असे धक्कादायक वक्तव्य केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.. सदर पत्रकार परिषदेत बोलताना संदीप तठ्ठे यांनी आपल्या शिंदे सेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे .. “आमच्यावर आधीच २५-२५ गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही,” असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले. या भडक वक्तव्यामुळे मेहकरमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे… या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धुळे शहरातील पवन नगर हुडको येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. मध्यरात्री पोलिसांच्या केलेल्या कारवाईत 500 किलो गांजा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि चाळीसगाव रोड येथे पोलिसांनी कारवाई केली आहे. पवन नगरातील अत्यंत लहान घरामध्ये खोक्यामध्ये पॅक केलेला गांजा आढळला. तब्बल पाचशे किलो गांजा पकडणारे तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या सिलेंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून ग्रामीण भागात रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन धोरणानुसार ग्रामीण भागात 45 दिवस घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होणार नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रॉकेल पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य असलेल्या सुमारे 7 लाख 24 हजार कुटुंबांना रॉकेल पुरवठा होणार. जिल्हा पुरवठा विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झालं आहे. आज जिल्हा प्रशासन आणि राज्य पुरवठा विभाग यांच्यात कॉन्फरन्सद्वारे अंतिम धोरण निश्चित होणार आहे.
KDMC मध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. सभापती शर्यतीत शेट्टी–म्हात्रे–भोईर गायकवाड आमनेसामने उभे असून ‘लाडकी बहीण’ ठरणार गेमचेंजर? मल्लेश शेट्टी, विकास म्हात्रे, जयवंत भोईर यांची थेट स्पर्धा रंगणार आहे. महेश गायकवाड यांचाही युवा चेहरा म्हणून दावेदारीत सहभाग आहे. सर्व इच्छुकांनी प्रतिष्ठा पणाला लावत लॉबिंगला सुरुवात केली आहे. ठाणे, मुंबई ते दिल्लीपर्यंत भेटीगाठींना वेग आलं आहे. मात्र पुरुषांची रस्सीखेच पाहता नाराजी टाळण्यासाठी KDMC मध्ये ‘लाडकी बहीण’ म्हणून विजया पोटे नाव चर्चेत आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे… असं सूचक विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे.
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा झाला आहे. मंदिर परिसरात नकली साप आणि वाघाचे कातडे ठेवून भीतीचं वातावरण निर्माण करायचा. रिमोट कंट्रोल सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करायचा. संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची उकळपट्टी करायचा. भोंदूबाबा बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून महागात विक्री करायचा. 100 रुपयांच्या वस्तूला 10 हजार ते 1 लाखांपर्यंत विक्री करत गंडवायचा. नकली खडे आणि रत्ने दैवी असल्याचा दावा करत विक्री करायचा. तर डोंबिवली निळजे परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक अधिकाऱ्यांना कर्जदार आणि साथीदारांकडून बेदम मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ करून 19 व्या मजल्यावर अधिकाऱ्यांना नेऊन कोंडून ठेवत धमक्या दिल्याचा प्रकार घडला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना घेतलं आहे. दुसरीकडे जळगावच्या जैनाबाद परिसरात 500 रुपये न दिल्याने तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. धारदार शस्त्राने वार केल्याने तरुणाचे आतडे बाहेर निघाले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. नितीन नाना काळे 35 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे.. यासह देश विदेश, मनोरंजन, क्रीडा, क्षेत्रासह राज्यातील ठळक बातम्यांचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचू शकता.