
Maharashra Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील उर्वरित भागातही पाऊस बरसत आहे. मुंबईत तर मान्सूनच्या पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रेल्वेरुळ पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी इमारती कोसळण्याच्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मान्सूनच्या पहिल्याच पावसात काही ठिकाणी जीवितहानीदेखील झाली आहे. विशेष म्हणजे आगामी चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
मान्सूनच्या पहिल्याच पावसात विरारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे स्लॅबचे प्लास्टर डोक्यावर पडल्याने 30 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. विरारच्या गोपचरपाडा परिसरातील पूजा अपारमेंट मधील रूम नंबर 335 मध्ये आज दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. लक्ष्मी राजू सिंग असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून ती आपल्या दोन मुलांसह घरात झोपली असता ही दुर्घटना घडली. याघटनेत दोन्ही मुले सुदैवाने थोडक्यात बचावली आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळावर पोहचून मयत महिलेसह तिच्या मुलांना बाहेर काढले आहे. ज्या इमारतीत ही घटना घडली ती इमारत 30 वर्षे जुनी होती. त्यामुळे वसई विरारमधील जर्जर आणि अतिधोकायड इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दुसरीकडे मलबार हिल येथे संरक्षण भिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांकडून या भागाची पाहणी करण्यात आली. त्यांनी तत्काळ सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. या इमारतीमधील रहिववाशांना प्रशासनाच्या मदतीने स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खचलेला भाग आहे त्याचा ढिगारा हटवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि पोलिस प्रशासन यांना देण्यात आले आहेत. या मार्गाने अमित शहा आज रात्री येणार होते त्यांच्या मार्गातही बदल करण्यात येणार आहे.
या पहिल्या पावसाचा फटका सीएसएमटी रेल्वे स्थानकालाही बसला. येथे पावसामुळे एक झाड कोसळले आहे. हे झाड पार्किंगमध्ये होतं. वाऱ्यामुळे तसेच पावसामुळे हे झाड उन्मळून पडले आहे.
नवी मुबंईत खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर धारावीतील काही विद्यार्थी अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात खारघर अग्निशमन दलाला यश आलं आहे. येथे पाच जण अडकले होते, त्याचं रेस्क्यू करण्यात आलं आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी पांडवकडा येथे हे विद्यार्थी गेले होते.
ठाणे जिल्ह्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदीत तीन गुराखी अडकले होते. ही बातमी समजताच स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून त्यांची सुटका केली. कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ पावसामुळे उल्हास नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून, नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली होती. त्यामुळेच येथे तीन गुराखी अडकून पडले होते. ही घटना समजसल्यानंतर केडीएमसी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं होतं. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. अशा वेळी दोन धाडसी स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता बेटावर अडकलेल्या तिघांची यशस्वी सुटका केली. स्थानिक नागरिकांकडून या तरुणांचे कौतुक होत आहे
बदलापुरात तुफान पाऊसस
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये आज अवघ्या 4 तासात तब्बल 160 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. उल्हास नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून पूरस्थिती निर्माण झाल्यास 12 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्याची पालिकेची तयारी असल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिलीय.
जोदरार पावसामुळे पुण्यातही मोठे नुकसान झाले आहे. मासेमारी करणाऱ्या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या कडेला ही घटना घडली. संतोष गुलाब खांडवे असे वीज पडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. युवकाचा मोबाईल तसेच अंगावरील कपडे विजेमध्ये खाक झाली आहेत.