मोठी बातमी ! TET पेपरफुटी प्रकरणात प्रकरणात पहिली मोठी कारवाई, 3 जण पोलिसांच्या ताब्यात
TET पेपरफुटीची माहिती समोर येतात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी आता पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे.

उद्या होणारा शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, मात्र आता ही परीक्षा भविष्यात काही दिवसांनी होण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीची माहिती समोर येतात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणी आता पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तिघेजण ताब्यात…
ठाण्यातील पेपर फुटीप्रकरणी आता पोलिसांकडून पहिली मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा पेपर लीक करणाऱ्या टोळी विरोधात भिवंडीत कारवाई करण्यात आली आहे. कोनगाव पोलिस ठाणे हद्दीत लावलेल्या सापळ्यात तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद होत आहे. त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाणार आहे.
परीक्षा पुढे ढकलली
टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी, महाराष्ट्रातील एकूण 37 ठिकाणी 1728 केंद्रावरती जवळपास सहा लाख 125 विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा उद्या होणार होती. आता पेपर फुटी प्रकरणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षक पात्रता परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे पार पाडणे हा परीक्षा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या गैरप्रकाराची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याने उद्या 28 जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही
पुढे बोलताना प्रिया शिंदे यांनी म्हटले की, पेपरफुटी नंतर एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतलं जाणार नाही, पुनर्परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. लवकर परीक्षा कधी होणार आहे याचं नियोजन लवकर कळवू. सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषींवर निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असणार नाही. यामध्ये उमेदवारांचा दोष नाही. पुन्हा रजिस्ट्रेशन फी आकारणार नाही.