
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७:३० वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र, सकाळच्या सत्रापासूनच राज्याच्या विविध भागांतून ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहेत. रायगड, सोलापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मशीन बंद पडल्याने मतदारांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले.
रायगड जिल्ह्यात मतदानाच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अलिबाग येथील कावीर मतदान केंद्र (क्र. ७१) येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदानाची प्रक्रिया थांबली होती. परिणामी, भर उन्हात मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. अलिबागपाठोपाठ कर्जत मधील हलवली येथील केंद्रावरही मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पाथुर्डी (केंद्र क्र. २२४) येथे ईव्हीएम मशीन सुरूच न झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली. मतदान सुरू होण्याची वेळ होऊनही मशीन प्रतिसाद देत नसल्याने या ठिकाणी अद्याप प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होऊ शकलेली नाही. तर दुसरीकडे, सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. येथे शिवसेना ठाकरे गट उमेदवार सोमनाथ राऊत यांनी मतदान केंद्राची पूजा करून मतदानाला सुरुवात केली. सोलापूर जिल्ह्यात ६८ जिल्हा परिषद जागा आणि १३६ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे.
वाळूज येथील मतदान केंद्रावर एक तांत्रिक अडचण समोर आली. मतदारांनी मत दिल्यानंतर मशीनमधून येणारा बीप आवाज येत नसल्याचे लक्षात आले. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. प्रशासनाने तातडीने दखल घेत काही वेळानंतर ही मशीन बदलली. त्यानंतर आता मतदानाला पुन्हा वेग आला.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील चचेगाव (बूथ क्र. ७८) येथेही सुरुवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडली. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमध्ये मोठी चुरस असल्याने समर्थकांची आणि मतदारांची मोठी गर्दी होती. ईव्हीएममुळे झालेल्या विलंबाने मतदारांमध्ये अस्वस्थता होती, मात्र झोनल अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
निवडणुकीचा परिणाम केवळ मतदान केंद्रावरच नाही, तर बस स्थानकांवरही दिसून येत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक प्रवाशांनी हाऊसफुल्ल झाले आहे. ग्रामीण भागात मतदानासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने आणि त्या तुलनेत बस कमी असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे.