मोठी बातमी! संजय राऊत यांच्या कार्यक्रमस्थळी मोठा राडा, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येऊन… वातावरण तापलं!
अयोध्येतील राम मंदिर देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेल्या 'रामरक्षा' आंदोलनांतर्गत खासदार संजय राऊत यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव येथे भेट देऊन आंदोलन व रामरक्षा पठण केले. यावेळी मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. अयोध्येतील राम मंदिर देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनांतर्गत खासदार संजय राऊत यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव येथे भेट देऊन आंदोलन व रामरक्षा पठण केले. मात्र या कार्यक्रमावेळी मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मोरगावमध्ये नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राडा घातल्याचा आरोप
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या कार्यक्रमात राडा घालणारे लोक हे भाजपचे पदाधिकारी होते. आपल्या पक्षाचे अपयश लपवण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांचे आरोप आम्हाला मान्य नाहीयेत. त्यांच्या विरोधात आम्ही पोलिसांत तक्रार देणार आहोत. आम्हाला राडा घालणाऱ्यांची नावे माहित नाहीत. आम्ही त्यांची पूर्णपणे माहिती घेऊ आणि तुम्हाला देऊ अशी माहिती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, आमचा कार्यक्रम यशस्वी झाला हे त्यांना पहावलं नाही. त्यामुळे त्यांनी राडा घातला. त्यांचा पक्ष कोणताही असो, ते युतीचे लोक आहेत. संजय राऊत हे इथे आले असताना त्यांना कुणीतरी जाणून बुजून इथे पाठवलं आहे असा आरोपही या ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
1400 कोटी रुपये लुटले – संजय राऊत
रामरक्षा पठण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, राम मंदिरासाठी हजारो कार सेवकांनी बलिदान दिलं. आम्ही त्या आंदोलनात होतो. 1400 कोटी रुपये लुटले, कॅमेरा असतांनाही पैसे लुटले गेले. ज्या रामाने सत्ता दिली त्याच्याच मंदिरात चोरी करतात आणि आम्हाला म्हणतात हिंदुत्व सोडले. आमच्या सोबत उभे राहणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. हे ढोंगी आहेत, आधी म्हणायचे देवाला घाबरले पाहिजे, पण आता देव यांना घाबरायला लागला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, यांचे हे पाहून राम पुन्हा वनवासात जाईल. मोदींच्या खात्यात साडे दहा हजार कोटी रुपये आहेत. बारामतीकरांनो जागे व्हा. बाळासाहेबांनी खरा राम मंदिर उभे केले. बाबरी पाडली तेव्हा भाजपवाले तेव्हा पळून गेले होते. त्यामुळे खऱ्या शिवसेनेला रामरक्षेचा हक्क आहे.