सद्गुरुचं ऐकून शेती करायला गेला अन् झाले 2 कोटी कर्ज, शेवटी मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकला, कोण आहे तो अभिनेता?
सद्गुरु यांच्या सल्ला ऐकून या अभिनेत्याने मुंबई सोडून थेट शेती करण्याचा घेतला निर्णय. पण झालं 2 कोटी रुपयांचे कर्ज. शेवटी मुलाच्या शाळेबाहेर विकावा लागला भाजीपाला. कोण आहे हा अभिनेता?

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतील रोशेशच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश कुमारने अभिनयापासून काही काळ दूर जात शेती करण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये मुंबई सोडून त्याने बिहारमधील आपल्या गावाची वाट धरली. केवळ पैसे कमावणे हा त्यांचा उद्देश नव्हता तर शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष अनुभवून समजून घेण्याची त्याची इच्छा होती.
सद्गुरूंच्या विचारांचा राजेशच्या या निर्णयावर मोठा प्रभाव पडला. ‘रॅली फॉर रिव्हर्स’सह विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असताना त्याने तरुणांनी शेतीकडे वळावे असा संदेश ऐकला. त्यानंतर शेतकऱ्यांना केवळ सल्ला देण्यापेक्षा स्वतः शेती करून त्यांची परिस्थिती समजून घेण्याचा निर्णय त्याने घेतला. त्याने हॉर्टिकल्चर अर्थात बागायतीपासून सुरुवात केली.
..म्हणून झाला कर्जबाजारी
मात्र, शेतीचा प्रवास त्याच्यासाठी अत्यंत खडतर ठरला. सुरुवातीला लावलेली झाडे चांगली वाढत असतानाच तब्बल 35 वर्षांनंतर परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे त्याची संपूर्ण मेहनत वाहून गेली. त्यानंतर त्याने पुन्हा सुमारे 15 हजार झाडे लावली; मात्र कोरोना महामारीमुळे त्यांचे नियोजन विस्कळीत झाले. पुढे पाण्याच्या समस्येनेही त्याला मोठा धक्का दिला. जवळपास 500 फूट बोअरवेल खोदूनही पाण्याचा थेंब मिळाला नाही.
सततच्या नुकसानीमुळे राजेशची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्याने आपली संपूर्ण बचत शेतीत गुंतवली आणि अखेर त्याच्यावर सुमारे 2 कोटी रुपयांचे कर्ज झाले. परिस्थिती इतकी कठीण झाली की, मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकूनही त्याने आपला उदरनिर्वाह केला.
आता किती आहे कर्ज?
तरीही त्याने या काळाकडे अपयश म्हणून पाहिले नाही. आध्यात्मिकतेमुळे कठीण परिस्थितीतही तणाव आणि नैराश्यापासून दूर राहता आल्याचे त्याने सांगितले. सातत्याने प्रयत्न करत राहिल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारली. एप्रिलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2 कोटींच्या कर्जापैकी आता केवळ 10 ते 15 टक्के कर्ज, म्हणजे अंदाजे 20 लाख रुपये, बाकी असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, राजेश कुमारने अभिनयाच्या क्षेत्रातही पुन्हा प्रवेश केला. ‘साराभाई वर्सेस साराभाई’मधील रोशेशची त्याची लोकप्रिय ओळख आजही कायम आहे. ‘सैयारा’, ‘है जवानी तो इश्क होना है’, ‘ओह माय डॉग’ आणि ‘निशानची’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये तो दिसला आहे.
