उठता येईना, बसता येईना, पोटात प्रचंड…मनोज जरांगेंची अवस्था नेमकी कशी आहे; स्वत:च सगळं सांगितलं!
मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईच्या दिशने निघालेले आहेत. त्याचदरम्यान त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांनी मध्येच एका ठिकाणी सलाईन लावलं आहे. स्वतःच्या तब्येतीबद्दल जरांगेंनी भाष्य केलं आहे.

मी मुंबईच्या दिशेनेच आहे. पण मला आज सलाई लावल्याने उठता नाही आलं. मला आमच्या नारायणगडाच्या गुरु गादीनं महंत गुरुवर्यांनी सांगितलं की तुम्हाला सलाईन घ्यावंच लागणार आहे. त्यांनी मला गेल्या किती वर्षांत अशी कोणतीही विनंती केलेली नाही. त्यांनी तासभर सांगितलं की, आमच्यासाठी तुम्हाला सलाईन घ्यावं लागतंय. कोणत्या गोष्टीमध्ये गुरुंचं ऐकायचं, अन् कोणत्या गोष्टीत ऐकायचं नाही समजतं. मी यामध्ये त्यांच ऐकणार नव्हतो परंतू शेवटी गुरुंची विनवणी पागून मन तयार झालं. मला उठताही येईना, बसताही येईना. उठताना पायांमध्ये प्रचंड आग होते, असं मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या तब्येतीवर बोलताना सांगितलं आहे.
बीडमधील पाटोद्यात जरांगे सलाईन घेत आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की, सरकारनं काहीतरी ड्राफ्ट पाठवला आहे. पण हे नेहमी फसवतात. त्यामुळं माझं डोकं चिडलं आहे. पण मी मेलो तरी हटणार नाही. उद्या दुपारी 1 वाजेनंतर मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. उद्या 100 टक्के मुंबईला जाणार असं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. आझाद मैदानावर कोण जाऊ देत नाही, ते बघतोच असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आता याप्रकरणात पुढे मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये संघर्ष वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले..
मला असं वाटतं राज्य सराकारने नेहमीचं चर्चा केली. १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्या. मागणीतल्या अडचणीही आम्ही त्यांना सांगितल्या. आता त्यांनी या सणासुदीच्या काळामध्ये, गणेशोत्सवाच्या पर्वामध्ये पुणे मुंबईमध्ये गणेशोत्सवात किती उत्साह असतो हे आपल्याला माहिती आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकं येतात त्यामुळे जरांगेंनी आंदोलनाचा निर्णय करु नये. वारंवार उपोषण केल्यामुळे त्यांच्या तब्येतीवरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांनी उपचार घेतले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. सरकार सगळ्या गोष्टी मान्य करत असताना त्यांनी गणेशोत्सवात मुंबई-पुण्यात येऊन ताण निर्माण होईल, असं वागू नये, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.