मोठी बातमी! रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा मुद्दा पुन्हा तापणार? राज ठाकरे आक्रमक, आता थेट केली ही मोठी मागणी
मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली, यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर सरकारने सध्या कारवाई होणार नसल्याचं म्हटलं आहे, यावरून राज ठाकरे यांनी आता जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुण्यातील टिळक स्मारक मंदिर सभागृहात वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ‘माझ्या मनातला महाराष्ट्र, मराठी अस्मिता’ या विषयावर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्याख्यान पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली होती. सरकारच्या या मराठी सक्तीच्या धोरणाला टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी विरोध केला. सरकारच्या या भूमिकेविरोधात एक मे पासून संपावर जाण्याचा इशारा रिक्षा चालक संघटनांकडून देण्यात आला होता. यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर सरकारने माघार घेतली, मराठी भाषेची सक्ती असेल परंतु 15 ऑगस्टपर्यंत कारवाई होणार नाही, असा तोडगा यावर सरकारने काढला. तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा देखील शिकवली जाणार आहे. यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या विषयावर बोलताना रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चांगलंच फटकारलं आहे. आम्ही मराठी बोलणार नाही, असं म्हणण्याची यांची हिंमतच कशी होते? आपले मंत्री त्यांना मराठी शिकायला वेळ देतात. बाकीच्या राज्यात असं होत नाही, तुम्ही गुजरातमध्ये जाऊन बघा, तामिळनाडूमध्ये जाऊन बघा असं होत नाही. यांची लायन्स रद्द करा अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान पुढे बोलताना राज ठाकरे यांनी असं देखील म्हटलं की, सध्या आम्ही जातीपातीच्या राजकारणामध्ये सापडलो आहोत. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये विभागले आहे. लेखक कोण आणि कवी कोण त्यांची देखील जात पाहिले जाते, जात पाहून पुस्तक विकत घेतलं जातं. त्यांना फक्त वाद पेटवायचा आहे, यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हलटं आहे.
