मोदींची कोणती भीती? रोखठोक मुलाखतीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरापासून ते निवडणुकांपर्यंत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी भाजपला निवडून दिलं तर अच्छे दिन तर नाही, पण काळे दिन नक्की येतील, असा टोला लगावला.

मोदींची कोणती भीती? रोखठोक मुलाखतीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2024 | 8:51 AM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या रोखठोक मुलाखतीतून एक भीती व्यक्त केली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी ही भीती बोलून दाखवली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आम्हाला हे चिन्ह किंवा पक्षाचे नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोच्च न्यायालयावर आणतात की काय असा संशय आहे, अशी भीतीच उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनासााठी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी ही भीती व्यक्त केली.

पक्षांतर केल्यानंतरही अपात्रतेच्या केसचा निकाल लागला नाही. लवादाने दिलेला निर्णय चूक होता, निवडणूक आयोगाला निकाल देण्याचा अधिकार आहे का? कारण कोर्टाने म्हटलंय तुम्ही लोकप्रतिनिधीवरून पक्ष ठरवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला नकली सेना म्हणत आहेत. याचा अर्थ उघड आहे. निवडणूक आयोग त्यांचा नोकर आहे. लवादानेही ते म्हणतील तसं काम केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये असा अप्रत्यक्ष दबाव पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयावर आणतात की काय असा संशय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दहा वर्षात तुम्ही काय केलं?

औरंगजेबाचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरूनही त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. औरंगजेब हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का? हाच तर माझा मुद्दा आहे. तुम्ही 10 वर्ष काय केलं? हे सांगितलं पाहिजे. औरंगजेबाचं काय सांगत आहात? शेतकरी आत्महत्या करत आहेत. तिकडे हे लक्ष देत नाहीत. महिलांवर अत्याचार होत आहेत. तिकडे लक्ष नाही, पाच वर्षांनंतर बघू. तुम्हीच सांगितलं होतंत ना, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, उत्पन्न दुप्पट करू… याच हमीभावासाठी शेतकरी दिल्लीत यायला निघाले तर तुम्ही त्यांच्यावर बंदुका रोखता? त्यांच्यावर अश्रुधूर सोडता? त्या शेतकऱ्यांना तुम्ही दहशतवादी म्हणता. हे शेतकरी देशातले लोक नाहीत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

काळे दिवस येऊ शकतात

गेल्या 10 वर्षांत ज्यांनी नुसत्या थापा मारल्या, त्या थापाड्यांना तुम्ही डोक्यावर घेताय की फेकून देताय? या थापाडय़ांना पुन्हा डोक्यावर घेतलं तर पुन्हा 10 वर्षे थापाच खाव्या लागतील आणि ऐकाव्या लागतील. पण आता जर का यांना फेकून दिलं तर देशात शांतता नांदेल. कायदा-सुव्यवस्था राहील. लोकशाही टिकेल. अन्यथा देशासमोर मला वाटतं की काळे दिवस आहेत. अच्छे दिन तर काही आले नाहीत, पण काळे दिवस मात्र येऊ शकतात, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us