पुण्यात विषारी दारुच्या घटनेनंतर महाराष्ट्रात मध्यरात्री सर्वात मोठी छापेमारी, पोलिसांना सापडलं असं काही…
महाराष्ट्रात विषारी दारू दुर्घटनेनंतर पोलिसांची राज्यव्यापी महा-छापेमारी सुरू झाली आहे. पुणे, नागपूर, सांगली आणि भिवंडीत एकाच वेळी ४३ हून अधिक ठिकाणी छापे टाकून हजारो लिटर घातक रसायन जप्त करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर राज्यभरात अवैध दारु अड्ड्यांविरुद्ध युद्धपातळीवर धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे ग्रामीणसह सांगली आणि नागपूर जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत शेकडो छापे टाकून हजारो लिटर दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले आहे.
पुण्यात मृत्यूचे तांडव; भिवंडीत धागेदोरे, ५,९२९ लिटर मेथेनॉल जप्त
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. फुगेवाडी आणि उरुळी कांचन भागात शनिवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने सूत्रे हलवत पुणे आणि पिंपरी परिसरात ४,४८० लिटर गावठी दारू जप्त केली. तर दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे ४२,००१ लिटर घातक रसायन जागेवरच नष्ट केले. या प्रकरणी आतापर्यंत ५२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या विषारी दारूचे धागेदोरे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपर्यंत पोहोचले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भिवंडीतील एका गोदामावर शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून तब्बल ५,९२९ लिटर मेथेनॉलचा साठा जप्त केला. पुण्यात विषारी दारू तयार करण्यासाठी याच मेथेनॉलचा पुरवठा करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
मुळशी तालुक्यात पोलिसांचा बडगा
पुणे ग्रामीणमधील मुळशी तालुक्यात अवैध दारूच्या व्यवसाय समोर आले आहेत. पौड पोलिसांनी रिहे, कातरखडक, घोटावडे, माले, आंबवणे, भादस, मुठा आणि करमोळी परिसरात सलग दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यादरम्यान दुर्गम भागात चालणाऱ्या १० ते १२ हातभट्टी दारूच्या भट्ट्या पोलिसांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत.
सांगलीत जेसीबीच्या साहाय्याने हातभट्टी केली जमीनदोस्त
पुण्यातील घटनेचे तीव्र पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले आहेत. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (LCB) माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील ओढ्याकाठी सुरू असलेल्या एका मोठ्या हातभट्टीवर धडक कारवाई केली. पोलिसांनी थेट जेसीबीच्या साहाय्याने ही हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत ७५० लिटर दारूचे रसायन आणि इतर साहित्य नष्ट करण्यात आले. पोलिसांचा सुगावा लागताच दोन संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नागपुरात ४३ ठिकाणी धाडी; ५६ जणांवर गुन्हे दाखल
विदर्भाची राजधानी नागपूरमध्येही शहर आणि ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील तब्बल ४३ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून ५६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंगणा, कामठी, कोराडी आणि एमआयडीसी परिसरात ही करावाई करण्यात आली. यात नागपूर शहर पोलिसांनी तहसील ठाण्याच्या हद्दीतील टिमकी कोलबा स्वामी वाचनालयाजवळ आणि गिट्टीखदान परिसरातून दारू विक्री करणाऱ्या महिला आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर गावठी, देशी दारू आणि सडवा जप्त करण्यात आला आहे.
बळी गेल्यानंतरच पोलिसांची झोप उडते का? नागरिकांचा संतप्त सवाल
एकीकडे पोलीस प्रशासन या कारवाईचे आकडे सादर करत असले, तरी सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागपूर आणि पुण्याच्या स्थानिक नागरिकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. अनेक वर्षांपासून हे अवैध धंदे पोलिसांच्या नाकाखाली सुरू होते, मग पुण्यात १९ निष्पाप लोकांचा बळी जाईपर्यंत पोलीस ढिम्म का होते? आधीच कारवाई का केली गेली नाही? असा सवाल केला जात आहे.
दरम्यान सध्या राज्यभरात सुरू असलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले असले, तरी ही मोहीम अशीच सुरू राहणार की काही दिवसांत पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ होणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.