विलिनीकरण करायचे की गळाभेट घ्यायची, हे शिंदे ठरवतील, शिंदे आणि ठाकरे हे दोघे… अब्दुल सत्तार यांचं बेधडक विधान
शिवसेना पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. या संवादात त्यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. ते नेमकं काय म्हणाले वाचा...

निवृत्ती बाबार, प्रतिनिधी: शिवसेना पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच शिवसेनेच्या विलिकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी शिवसेनेच्या विलिकरणावर बोलताना, ‘विलिनीकरण करायचे की गळाभेट घ्यायची, हे शिंदे ठरवतील’ असे स्पष्ट म्हटले आहे.
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना अब्दुल सत्तार म्हणाले की, आमच्या सहा आमदार आणि एका खासदाराने सर्व माहिती दिली. सरकारमध्ये काय अडचणी येतात त्या सांगितल्या. आमच्या जिल्ह्यांतर्गत वाद आहे. भाजप आणि आम्ही सत्तेत आहोत. पण एकमेकांना त्रास देत आहेत. तो कमी व्हावा हेच सांगितलं. नवीन सरकार आलं तेव्हा एकनाथ शिंदेंनी आमच्याशी चर्चा केली. आताही चर्चा केली. महायुतीचा धर्म पाळायला सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले, आमचे जिल्ह्यात सहा आमदार आणि एक खासदार आहे. त्यांचे तीन आमदार आहे. सत्तेत असूनही आम्ही त्यांना सर्व सहकार्य करत आहे. पण आता जी परिस्थिती झाली त्यामुळे बोलावं लागलं. त्यावर काय उपाय करायचा ते मुख्यमंत्री आणि शिंदे ठरवतील. तीन वर्षानंतर लोकसभा आहे. सव्वातीन वर्षानंतर विधानसभा येणार आहे. आतापासूनच स्टॅटेजी असली पाहिजे. निवडणुकीत महायुती राहणार की राहणार माहीत नाही. राहणार असेल तर दोघांनी आचारसंहिता पाळायला पाहिजे. त्यांनीही पाळाव्यात आम्हीही पाळू. चुका त्यांच्याच आहेत, असं नाही. आमच्याही असतील. पण वरिष्ठांनी त्यात निर्णय घालावा.
संजय राऊतांना देखील रोखठोक उत्तर
खासदार संजय राऊत यांनी नुकतात पश्चाताप व्यक्त करायचा असेल तर मातोश्री दारे उघडी आहेत असे म्हटले होते. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, आमचे वरिष्ठ नेते, पक्षप्रमुख हे शिंदेंचा जो निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. भविष्यात जे आदेश देतील तो मान्य करू. विलिनीकरण करायचे की गळाभेट घ्यायची हे शिंदे ठरवतील. हा अधिकार त्यांना आहे. त्यांच्या विश्वासावर आम्ही बदल केला. आम्ही चांगलं काम केलं असेल तर भाजपने ते मान्य केलं पाहिजे.
पुढे ते म्हणाले की, अंबादास दानवेंनी विलिनीकरणाची इच्छा व्यक्त केली. त्याला मी उत्तर दिलं. पण त्याचा निर्णय शिंदे घेतील. शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य राहील. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्यात संवाद आहे की नाही माहीत नाही. कोणताही बदल करायचा असेल तर तो आम्ही एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच करतो. पण आज जी परिस्थिती आहे, त्यामुळे आम्ही बैचेन आहोत. बैचेन नसतो तर अर्ज भरला नसता. आम्ही पागल तर नाहीये. महापालिका, नगरपालिका, लोकसभा विधानसभा झाल्या. आता समोर काही नाही. पण मोठा भाऊच छोट्या भावाकडून सर्व सत्ता घेत आहे. शिवसेनेच्या हातात एकेकाळी युतीचा कंट्रोल होता. आज भाजपच्या हातात कंट्रोल आहे.