अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी घेतली अबू सालेमची भेट? विहिंपच्या दाव्याने मोठी खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अबू सालेमची भेट घेतल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला आहे. यामुळे आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात जाऊन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमची भेट घेतल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या या दाव्यामुळे आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. या भेटीवरून प्यारे खान यांच्या चौकशीची मागणी विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे यांनी केली आहे. संवेदनशील घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे ही गंभीर बाब असल्याचे विहिंपने म्हटले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआय आणि एनआयएमार्फत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात विहिंपच्या वतीने नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. एवढंच नाही तर या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. अबू सालेमला भेटण्यामागील कारणे आणि भेटीचे स्वरूप तपासण्याची मागणीही यावेळी विहिंपने केली आहे.
अमोल ठाकरे नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात जाऊन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमची भेट घेतल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती अमोल ठाकरे यांनी दिली आहे.
प्यारे खान यांनी नाशिक येथील कारागृहात जाऊन १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याची भेट घेतल्याने आम्ही चौकशीची मागणी केली आहे. संवेदनशील घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे ही गंभीर बाब आहे, त्यामुळे प्यारे खान यांना पदावरून हटवले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय आणि एनआयए मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी आहे, असं यावेळी अमोल ठाकरे यांनी म्हटलं आहे.