
“व्हिजीबिलीटी नसताना या विमानाला बारामतीला जाण्याची परवानगी कशी दिली? टेक ऑफ करायला कसं दिलं? एआयएबीने त्याकडे दुर्लक्ष केलं. दोन्ही पायलटांना बारामती विमानतळावर लँडिंगची माहिती होती. त्यांना 29 नंबरचा रनवे आणि 11 नंबरचा कुठला हे माहीत होतं. या रिपोर्टमध्ये तसं नमूद केलं आहे. ते बारामतीत अनेकदा लँड झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय” असं रोहित पवार म्हणाले. अजित पवार विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवलं. “2009 मध्ये वायएसआर रेड्डी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. त्यावेळी तपासासाठी नेमलेल्या त्यागी समितीने व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, खासकरुन व्हिआयपी विमानात असताना, असं त्यागी समितीने म्हटलं होतं. वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यावर त्यागी समिती नेमली होती. त्या समितीने हा रिपोर्ट दिला होता. तरीही व्हिजीबिलीटी नसताना विमान का लँड करण्यात आलं?” असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.
“अॅरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी होते. त्यामुळे अॅरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये अॅरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आलं पाहिजे” अशी मागणी रोहित पवार यांनी केली. “रिपोर्टनुसार विमान 4915 उडालं. लास्ट मेजर इन्स्पेक्शन 23 मार्च 2025 रोजी झालं होतं. याचा अर्थ हे विमान खराब होतं. त्यामुळे हे विमान अजितदादांना मुद्दाम दिलं का? असा संशय निर्माण होतो” याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं.
विमान शमशाबादला जाणार की नाही हे कळवलं नव्हतं
“जर्नी लॉग बुकमध्ये व्हिएसआर कंपनी कसा गोंधळ घालायची आणि डीजीसीए त्याला कसा सपोर्ट करायची ते दिसून येईल. शमशाबादला हे विमान जाणार होतं. पण बारामती एटीसीला हे विमान शमशाबादला जाणार की नाही हे कळवलं नव्हतं. मेलही केला नव्हता. रिपोर्टमध्ये फक्त बारामती टू बारामती असं उड्डाण दाखवलं आहे” असं रोहित पवार म्हणाले. “2023 च्या विमान अपघाताच्या एका अहवालात तपास अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली होती. या अहवालात तरी कोणाचेही नाव देण्यात आलेले नाही. दादांच्या बाबतीत भेदभाव का ? तपास अधिकाऱ्यांची नावे नाहीत याचा अर्थ ते घाबरले आहेत का ?” असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले.